वार्ताहर/ सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर आला असून हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
पूर्व भागातील बसवन कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, माविनकट्टी, पंत बाळेकुंद्री आदी भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे सर्व शेती जलमय झाली आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने शेतकऱयांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडणार आहे. शासनाने शेतकऱयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतातील सर्व बांध फुटून गेले असून परिश्रमावर पाणी फेरले आहे. आधीच लॉकडाऊन त्यातच पावसाचा कहर यामुळे शेतकरी मोठय़ा संकटात सापडला आहे.