प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाचा जोर नसला तरी शहरातील बसस्थानक आणि थांब्यांची दयनीय अवस्था प्रवाशांच्या दृष्टिने डोकेदुखीची ठरू लागली आहे. पावसापासून संरक्षण करण्यासाठी बसस्थानके आसरा होण्याऐवजी बिनकामाचे ठरू लागले आहेत. त्यांची स्थिती सुधारायची कोणी? या प्रश्नात प्रवाशांची परवड होत असून याकडे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. स्मार्टसिटी योजनेंतर्गत अनेक बस स्थानकाचा कायापालट करण्यात येत आहे. मात्र तो योग्य वेळेत होत नसल्याने समस्या निर्माण होत आहे.
बेळगाव शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. यामुळे सर्व काही चकचकीत होणार, असे सांगण्यात येत असले तरी समस्या गंभीरच बनत चालल्या आहेत. सुधारणांच्या वल्गना आणि वारंवार होणाऱया घोषणा हवेतच विरुन जाऊ लागल्या आहेत. याकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रवाशांना दुर्दशेचे दशावतार भोगावयास लावणाऱयांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. वायव्य परिवहनच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या आहेत. त्या योजना पूर्णत्वास आणण्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभावही प्रकर्षाने जाणवू लागला आहे. उन्हाळ्यात गैरसोयींचे प्रमाण तितके नव्हते. मात्र पावसात त्या ठळकपणे जाणवत असूनही प्रशासन ढिम्म आहे.
मिळेल त्या ठिकाणी बूड टेकण्याची प्रवाशांवर वेळ
शहर आणि उपनगरांतील बसथांब्यांमध्ये सध्या असंख्य समस्या आवासून उभ्या ठाकल्या आहेत. काही ठिकाणच्या थांब्यांचे कामे हाती घेण्यात आली असून ती संपेतोवर या समस्यांना प्रवाशांना तोंडच द्यावे लागणार आहे. काही भागात पेव्हर्स बसविण्यात आले आहेत. मात्र तेही कुचकामी ठरत असून याचा त्रास प्रवाशांनाच सोसावा लागत आहे. बसची प्रतीक्षा करताना चक्क झाडाखाली किंवा मिळेल त्या ठिकाणी बुड टेकण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
पावसाळा असल्याने सर्वत्र खड्डय़ात साचलेली डबकी आणि चिखल असून अशा अवस्थेत थांबायचे कोठे? हा प्रश्नच आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सर्वत्र आबाळच होऊ लागली आहे. यामुळे सर्वत्र साचलेला कचरा पहावयास मिळतो. प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकांची अवस्था बिकट आहे. प्रवासी शेडमधील बाक मोडकळीस आले आहे. याकडे वेळीच लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा वारंवार व्यक्त करण्यात आली.
पळापळीत नागरिकांच्या अंगावर उडतेय चिखलमिश्रीत पाणी
बेळगाव शहर आणि परिसरातील इतर बसथांब्यांची परिस्थितीही अतिशय बिकट आहे. प्रतीक्षेत थांबणाऱया प्रवाशांना चिखल आणि भल्यामोठय़ा डबक्यातून वाट काढत बसथांब्याकडे जावे लागत आहे. येथील थांबेही अतिशय अस्वच्छ असल्यामुळे तेथे थांबण्यापेक्षा रस्त्याशेजारीच उभे राहणे नागरिक पसंत करू लागले आहेत. बस आली की होणाऱया पळापळीत नागरिकांच्या अंगावर चिखलमिश्रीत पावसाचे पाणी उडू लागले आहे. बसथांबे आहेत, मात्र सुस्थितीत नाहीत. या प्रकाराने नागरिकांना छत्र्या उघडून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे या समस्या मिटणार तरी कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बसथांब्यांमध्ये जनावरांचेही आश्रय
स्मार्ट सिटी अंतर्गत काही ठिकाणी आधुनिक बसथांबे तयार करण्यात आले. परंतु त्याच्या बाजुलाच प्रचंड प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. शिवाय बसथांब्यांमध्ये जनावरेही आश्रय घेत असून मोकाट कुत्र्यांचाही तेथे वावर आहे. बसथांबे चिखल, माती, कचरा यांनी भरले असून प्रवाशांना तेथील बैठक व्यवस्थेची सुविधा घेता येत नाही, अशी स्थिती आहे..