प्रस्तावित काम रखडले
चिखलामुळे अपघाताची भीती
प्रतिनिधी / बांदा:
यंदाच्या वर्षी झालेल्या पावसामुळे बांदा-शिरोडा रस्त्यावरील खड्डय़ांमुळे मार्गावर चिखल झाला असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सदर मार्गावर काही ठिकाणी गटारच गायब झाल्याने पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन तात्पुरत्या स्वरुपात उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालक तसेच नागरिकांमधून होत आहे.
बांदा-शिरोडा मार्गाची दांडेली, पाडलोस, मडुरा, शेर्ले याठिकाणी दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. आता शाळा सुरू झाल्यास या मार्गाने विद्यार्थी सायकलने ये-जा करतात. पाडलोस येथे ग्रामस्थांनी खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले काम रोखले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी येत सदर रस्त्याचे काम प्रस्तावित असून त्याचे इस्टिमेंट दाखविण्यात आले होते. परंतु भविष्यात खड्डय़ांमुळे होणाऱया अपघातास जबाबदार कोण? असा सवालही नागरिकांनी केला होता. मात्र, अधिकारी निरुत्तर झाले होते. परंतु सद्यस्थितीत या रस्त्याच्या डागडुजीकडे बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अपघातात एखाद्याचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येईल काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
आरोस, दांडेली, न्हावेली, पाडलोस, रोणापाल, मडुरा, निगुडे, कास, सातोसे गावातील नागरिकांना जीव धोक्यात घालून वाहतूक करत या मार्गे बांदा बाजारपेठ गाठावी लागत आहे. या मार्गाची दैनावस्था झाल्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे भविष्यात होणाऱया परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पावसाने उघडीप घेतल्यानंतर तात्काळ तात्पुरत्या स्वरुपात तरी उपाययोजना करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. सदर मार्ग चिखलमय झाल्याने वाहन चालविताना अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. याचा जास्त फटका दुचाकी वाहनचालकांना होत आहे. येथे चिखल असल्याने गाडी स्लिप होऊन दुचाकीस्वार पडू शकतो तर काहीवेळा चिखल साचल्याने अचानकपणे दुसऱया बाजूने जावे लागते. यामुळे येथून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याने सार्वजनिक विभागाने हा रस्ता तात्काळ स्वच्छ करून वाहनचालकांना सुरळीत व सुरक्षीत करावा, अशी मागणी होत आहे.