प्रतिनिधी/ मडगाव
बाणावलीत आपण मार्गी लावत असलेल्या विकासकामांबाबत लोकांची दिशाभूल करून त्यात खो घालण्याचा प्रयत्न विन्जी व्हिएगश हे करत असल्याबद्दल स्थानिक आमदार चर्चिल आलेमाव यांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिएगश यांना बाणावलीत निवडणूक लढवायची आहे. पण त्यासाठी विकासकामांत खो घातल्यास मतदार त्यांना मते देणार नाहीत याचे भान त्यांनी ठेवावे, असा सल्ला आलेमाव यांनी त्यांना दिला आहे.
वार्का येथील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आलेमाव बोलत होते. यावेळी स्थानिक पेले फर्नांडिस, माजी सरपंच अशोक व अन्य उपस्थित होते. शुक्रवारी व्हिएगश यांनी काही शेतकऱयांना घेऊन तळेबांद-खारेबांद रस्त्याचे रूंदीकरण व अन्य कामांस आक्षेप घेताना ती अडविण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर आलेमाव यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
स्व. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना आपण पायाभूत साधनसुविधा विकास महामंडळाच्या अधिकारी व अभियंत्यांना घेऊन रस्ता उभारणी, विस्तार व रूंदीकरण तसेच अन्य आवश्यक कामे मिळून सुमारे 75 कोटींच्या विकासकामांचे अंदाजित खर्च तयार केले होते. पर्रीकर यांनी त्यातील तळेबांद, खारेबांद, सुरावली व ओडली मिळून 25 कोटींच्या कामांना मंजुरी दिली होती, याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले.
तळेबांद, खारेबांद येथील विकासकामे सुमारे 11 कोटींची असल्याचे त्यांनी नजरेस आणून दिले. यावेळी उपस्थित स्थानिक मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी आलेमाव यांच्या विकासकामे मार्गी लावण्याच्या कार्याची स्तुती केली. आलेमाव यांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नये. बाणावलीवासीय त्यांच्या मागे असून यावेळी त्यांनी साडेपाच हजारांच्या मताधिक्मयाने त्यांना निवडून आणले. येत्या निवडणुकीत मतदार 8 हजारांच्या मताधिक्याने त्यांना विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.