भारत जगात तिसऱया स्थानावर : 21 दिवसात 10 लाख नवे पॉझिटिव्ह रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना विषाणूचा कहर वाढत चालला आहे. मागील 24 तासात विक्रमी 62 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने देशात आता एकूण रुग्णांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या केवळ एकवीस दिवसात 10 लाखांचा टप्पा पार झाला आहे. यापूर्वी 16 जुलै रोजी 10 लाख बाधितांची नोंद झाली होती. 20 लाखांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे झालेल्या देशांमध्ये अमेरिका आणि ब्राझीलनंतर आता भारत जगातील तिसरा देश बनला आहे.
मागील चोवीस तासात देशात 62 हजार 538 प्रकरणे समोर आली आहेत. वाढीव रुग्णसंख्येमुळे देशात एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 20 लाख 27 हजार 74 झाली आहे. देशात आतापर्यंत 41 हजार 585 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात शुक्रवारपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासातील 886 मृतांचा समावेश आहे. भारतात सध्या 6 लाख 7 हजार 384 सक्रिय रुग्ण आहेत. शुक्रवारी 49 हजार 769 रुग्णांना डिस्चार्ज दिल्यामुळे एकूण डिस्चार्ज मिळालेल्यांचा आकडा 13 लाख 78 हजार 105 वर पोहोचला आहे.
भारतात कोरोनाची प्रकरणे दुप्पट होण्याचा दर 22.7 दिवस आहे, तर अमेरिकेत तो 60.2 आणि ब्राझीलमध्ये 35.7 दिवस आहे. भारतात ज्याप्रकारे कोरोनाचा वेग वाढत आहे, तो चिंताजनक आहे. 16 जुलैपासून देशातील रुग्णवाढीची कालमर्यादा कमी होत गेल्याचे दिसून येत आहे. 10 लाखांवरून 15 लाख रुग्णसंख्या होण्यासाठी 12 दिवस लागले. या काळात देशात दिवसाला 45 हजार ते 55 हजार या सरासरीने रुग्ण आढळून आले.
केवळ 9 दिवसात पाच लाख रुग्ण
6 ऑगस्ट रोजी देशातील रुग्णसंख्येने 20 लाखांचा टप्पा पार केला. 15 लाखांवरून 20 लाख रुग्णसंख्या होण्यासाठी केवळ नऊ दिवसांचाच कालावधी लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे या काळात भारत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णसंख्येत जगात पाचव्या स्थानी गेला. भारताने आता इटलीलाही मागे टाकले आहे.