प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व महापालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांच्या आधीन राहून शहरातील घरगुती गणेशभक्तांनी सहा दिवसांसाठी पाहूणा म्हणून आलेल्या बाप्पासह गौरी-शंकरोबाला गुरुवारी निरोप दिला. यावेळी सोशल डिस्टन्सही पाळत ‘गणपती बाप्पा मोरया…कोरोनाला सर्वजण मिळून हद्दपार करु या…’ अशा घोषणा देत गणेशभक्तांनी आपल्यातील सजगताही दाखवून दिली. गणेशमूर्ती व गौरी-शंकरोबाचे निर्माल्य विसर्जनावेळी गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढणार याची भिती सर्वांमध्ये सतत घोळत होती. मात्र महापालिकेसह सर्वच तालीम संस्था, पक्ष, संघटना, मंडळे व स्वयंसेवी संस्थांनी कोरोनाविरुद्द सुरु युद्धासाठी एक पाऊल पुढे टाकत चौकाचौकासह तिकटी, उद्याने, मोक्याचे ठिकाणे, प्रमुख रस्ते आदी ठिकाणी विसर्जनासाठी कुंडांची चोख व्यवस्था केली होती. या व्यवस्थेमुळे गणेशभक्तांच्या गर्दीवर नियंत्रण आलेच, शिवाय विसर्जनाला शिस्तही आली. शहरातील सर्व कुंडांमध्ये विसर्जित झालेल्या गणेशमूर्ती महापालिकेने ट्रक्टर-ट्रॉली, डंपर आणि टेम्पोद्वारे इराणी खणी नजिकच्या खणीत सोडल्या.
गणेशोत्सव म्हंटले की गणेश आगमन, देखावे आणि विसर्जनाच्यानिमित्ताने होणारी अलोट गर्दी डोळ्यासमोर आपसुक उभी राहते. गर्दी करुनच गणेशोत्सव साजरा करण्याची एक परंपराच सर्वत्र रुढ झाली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवातील गर्दीवर कसे नियंत्रण मिळवायचे हा प्रश्न घोघांवत होता. गर्दी झाल्यास कोरोनाचा फैलाव अटळ आहे, असे जिल्हा प्रशासन सातत्याने गणेशभक्तांना सांगत राहिले. पोलीस प्रशासनाने ही गर्दी रोखण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला. शिवाय गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱया गणेशमूर्ती उत्सवाच्या आधीच पाच दिवस घरी आणि मंडळांकडे घेऊन जाण्याचे आवाहन केले. या आवाहनाचा आदर करत हजारो घरगुती गणेशभक्त व मंडळांनी कुंभार गल्ल्यांमध्ये जाऊन गणेशमूर्ती स्वीकारल्या. त्यामुळे गणेशोत्सवदिनी गणेशमूर्ती घेण्याच्यानिमित्ताने होणाऱया गर्दीवर कमालीचे नियंत्रण आले. शिवाय कोरोनाचा फैलाव रोखणे आपल्याच हाती असल्याबाबतची जाणिव गणेशभक्तांमध्ये वाढू लागल्याचे प्रकर्षाने दिसून आले.
दरवर्षी गौरी आवाहनाच्यानिमित्ताने महिलांकडून पारंपरिक गीतांवर फेर धरुन रात्री जागवल्या जात असतात. यंदा मात्र महिलांनी फेर न धरता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीच्या युद्धात आम्हीही सहभागी आहोत असे दाखवून दिले आहे. गणेश आगमन आणि गौराई गीतांच्या सादरीकरणानिमित्ताने होणाऱया गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला भलेही यश आले असले तरीही गुरुवारी (दि. 28) आलेल्या विसर्जन कार्याच्यानिमित्ताने घरगुती गणेशभक्तांच्या होणाऱया गर्दी कसे नियमंत्रण ठेवायचे याची चिंता बळावली होती. मात्र महापालिका प्रशासनाने पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव, इराणी खण, कोटीतिर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा, गंजीवली खण आदी ठिकाणी गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जनास मनाई करण्याचा तडकाफडकी निर्णय घेत गर्दी टाळण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल उचलले. पोलीस प्रशासनाने तर सर्वच विसर्जनस्थळांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करुन गणेशभक्तांना इकडे यायचेच नाही, असा अघोषित इशारा दिला. दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून विसर्जनाचे ठिकाण म्हणून पाहिल्या जाणाऱया इराणी खणीला महापालिकेने चारही बाजूंनी कापडाचे बॅरीकेटींग करुन खणीकडे कोणालाच न सोडण्याची व्यवस्था केली.
याचबरोबरच विसर्जनासाठी शहरातील तालीम संस्था, मंडळे, संघटना व स्वयंसेवी संस्था आदीं कार्यकर्त्यांना चार बाय चार फुटांच्या कृत्रिम कुंडांचा पुरवठा करुन विसर्जन कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. कार्यकर्त्यांनीही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चार पाऊले पुढे येत विसर्जन कुंडात गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जित करण्याचे गणेशभक्तांना सातत्याने आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशभक्तांनी कुंडातच गणेशमूर्ती व निर्माल्य विसर्जित करुन कोरोनाचा संसर्ग रोखण्याबाबत आम्ही गंभीर आहोत, हे दाखवून दिले. शिवाय कुंडातच विसर्जन झाल्यामुळे पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव, इराणी खण, गंजीवली खण, कोटीतिर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा व विहिरीमधील पाणी प्रदुषित होण्याला आपोआप आळा बसला. आता अशाच पद्धतीने आता अनंत चतुदर्शीलाही (1 सप्टेंबर) विसर्जन कार्य करण्याला प्राधान्य देऊन पाणी प्रदुषण रोखण्यासाठी गेली दशके सुरु राहिलेल्या चळवळीला मंडळांनी यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.