आसाम मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम सरकारने बालविवाह रोखण्यासाठी आता कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी आसाममध्ये बालविवाह विरोधी कारवाईत आतापर्यंत 1800 हून अधिक जणांना अटक करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी दिली आहे. तसेच ही कारवाई आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.
आसाम पोलिसांनी बालविवाह विरोधात ‘झिरो टॉलरन्स’च्या भावनेवर कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बालविवाह निषेध अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱयांच्या विरोधात सध्या व्यापक कारवाई सुरू आहे. आतापर्यंत 1800 हून अधिक जणांना अटक झाली आहे. महिलांच्या विरोधात असलेले गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करावी अशी सूचना आसाम पोलिसांना केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आसाम सरकारने 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसोबत विवाह करणाऱया पुरुषांवर पॉक्सो अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. तर 14-18 या वयोगटातील मुलींशी विवाह करणाऱयांच्या विरोधात बालविवाह निषेध अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा नोंदविला जाणार आहे. बालविवाह विरोधातील युद्ध हे धर्मनिरपेक्ष असेल आणि कुठल्याही एका समुदायाला लक्ष्य केले जाणार नाही. अशाप्रकारच्या विवाहांकरता मौलवी आणि पुजाऱयांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय कुटुंब कल्याण सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आसाममध्ये माता तसेच शिशू मृत्युदर सर्वाधिक असून याकरता बालविवाह मोठे कारण ठरले आहे. राज्यात नोंद विवाहांपैकी 31 टक्के बालविवाह ठरू शकतात. बालविवाहाची सर्वाधिक प्रकरणे धुबरी जिल्हय़ात आढळून आली आहेत.