जिल्हय़ात 586 मुले बालसंगोपनाखाली : कोरोनामुळे आई-वडील गमावलेली चार बालके
- दरमहा दिले जातात 1100 रु.
- सद्यस्थितीत तातडीची मदत हवी
- सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा!
संदीप गावडे / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनामुळे आई-वडील दगावलेल्या बालकांचे संगोपन करण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये चार बालके सिंधुदुर्ग जिल्हय़ात आढळली आहेत. निराधार झालेल्या या बालकांना बाल संगोपनाखाली आणले जाणार आहे. सद्यस्थितीत विविध कारणांनी आई किंवा वडील दगावल्याने निराधार बनलेली तब्बल 586 मुले बालसंगोपनाखाली आहेत. त्यांना बालसंगोपन योजनेंतर्गत दिली जाणारी मदत सहा-सहा महिने शासनाकडून मिळत नसल्याने या निराधार बालकांना आधार देण्याची अत्यंत गरज आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बाल संरक्षण समितीची बैठक घेऊन कोरोनामुळे आई-वडील दगावलेल्या बालकांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हा बाल संरक्षण कक्ष व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत कोरोनाने आई-वडील दगावलेल्या बालकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये कोरोनाने आई-वडील दगावलेली चार बालके आढळली असून अजूनही काही बालके असतील, तर महिला व बाल विकास विभागाशी किंवा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सहा-सहा महिने मदतच नाही
कोरोनाने आई-वडील दगावलेल्या बालकांना बालसंगोपन योजनेखाली आणले जाऊन शासनाकडून मदत केली जाणार आहे. परंतु सद्यस्थितीत बालसंगोपनाखाली असलेल्या बालकांना सहा-सहा महिने मदतच मिळाली नाही. त्यामुळे या बालकांच्या आधाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुलांना दोनवेळचे जेवण, आरोग्य आणि शिक्षण देणे, हे मोठे प्रश्न आहेत. त्यासाठी दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी पुढे येऊन या मुलांसाठी आधार बनण्याची आवश्यकता आहे.
दरमहा दिले जातात 1100 रु.
ज्या बालकांचे आई किंवा वडील यांपैकी एक दगावलेले असेल किंवा आई-वडील दोन्ही दगावलेली असतील आणि त्या बालकांना बघणारे कोणी नसेल, म्हणजे घरातील कर्त्या-सवरत्या व्यक्तीचे निधन झाले असेल, तर त्या बालकांना महिला व बाल विकास विभागाच्या बाल संगोपन योजनेखाली आणले जाते आणि या बालकांच्या संगोपनासाठी शासनाकडून प्रत्येकी दरमहा 1100 रुपये दिले जातात. सिंधुदुर्ग जिल्हय़ात अशी 586 मुले बालसंगोपनाखाली आहेत. त्यांना 1100 रुपये दरमहा दिले जातात. परंतु या बालकांना सहा-सहा महिने शासनाकडून मदत मिळत नाही अशी परिस्थिती आहे. बालसंगोपनाखाली असलेल्या जिल्हय़ातील 586 बालकांना बालसंगोपन योजनेची मागील सहा महिन्यांपासूनची मदत मिळालेली नाही. त्यामुळे आता कोरोनाने आईवडील दगावलेल्या बालकांना बालसंगोपनाखाली आणले जात असताना त्यांना तरी वेळेत मदत मिळणार का प्रश्न आहे.
सद्यस्थितीत तातडीची मदत आवश्यक
निराधार बनलेल्या या मुलांना शासनाकडून बालसंगोपनसाठी मदत मिळेल तेव्हा मिळेल. परंतु त्यांना सद्यस्थितीत तातडीची मदत मिळणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग निराधार बालकांना शासनाकडून मदत मिळेल, परंतु आजच्या घडीला या बालकांना बघणारे कोणी नसेल, तर सामाजिक बांधिलकीच्या नात्याने कुणीतरी पुढे येऊन त्यांचा सांभाळ केला पाहिजे. त्यांच्या अन्नपाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. तरच त्या बालकांचे भविष्य उज्वल होईल.
त्या निराधार बालकांना बालसंगोपन योजनेखाली आणणार – म्हात्रे
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाने दोन्ही पालक दगावलेल्या बालकांचा शोध घेण्यात येत असून या बालकांना बालसंगोपन योजनेखाली आणले जाणार आहे. त्यामुळे त्या बालकांच्या जवळच्या नातेवाईकाकडून पालन पोषण होऊ शकेल. कुणीच पालन करणारा नसेल, तर बाल संरक्षण कक्षामार्फत योग्य तो निर्णय घेऊन त्यांना बाल सुधारगृहात ठेवण्यात येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी सांगितले.