फार्मसी शिक्षणासाठी आलेल्या अन्य राज्यातील विद्यार्थ्यांची स्थिती
प्रतिनिधी/ बेळगाव
फार्मसी शिक्षणासाठी देशातील विविध राज्यातून बेळगावात आलेल्या 80 हून अधिक विद्यार्थ्यांवर कोरोना लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे ‘बाहेर आल्यास पोलिसांचा मार आणि खोलीमध्ये उपासमार’ अशी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. पैसे संपल्याने खोलीचे भाडे थकलेले, दोन वेळ जेवणाची भ्रांती अशी अवस्था झाली आहे. मात्र या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह कोणत्याही सामाजिक संघटनेने अद्यापही पुढाकार घेतला नाही. यामुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रस्त्यावर येऊन आपली व्यथा मांडली.
बेळगाव येथील राणी चन्नम्मा फार्मसी कॉलेजमध्ये मुंबईसह उत्तरप्रदेश आणि अन्य राज्यातील असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर वैभवनगर येथे खोल्या करून ते रहात आहेत. लॉकडाऊनमुळे आपल्या गावी न जाता याच ठिकाणी अडकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र पैसे संपल्याने खोली भाडे देणेही त्यांना अशक्मय बनले आहे. तर हॉटेल आणि मेस बंद झाल्याने या विद्यार्थ्यांवर दोन वेळेचे जेवण मिळणेही बंद झाले आहे. सुमारे 80 हून अधिक विद्यार्थी लॉकडाऊनच्या संकटात सापडले आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने किंवा संबंधित कॉलेजच्यावतीनेही त्यांना मदत करण्यात आली नाही.
कुटुंबाशीही संपर्क तुटला
आपण बाहेरील राज्याचे असल्याचे सांगताच पोलिसांचा जाच सुरू होत आहे. आपल्या घराकडूनही पैसे न आल्याने खोलीचे भाडे कसे भरावे, जेवण कसे करावे याबाबत प्रशासनानेच मार्ग सूचवावा, अशी विनंती विद्यार्थ्यांनी यावेळी केली. दि. 22 मार्च रोजी परीक्षा होती मात्र लॉकडाऊनमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आपल्या कुटुंबाशीही संपर्क तुटला असून यामुळे काळजीत भर पडली आहे. प्रशासनाने मोफत रेशन अथवा आहार पुरवठा करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.