वनविभाग आणि पोलिसांचा केवळ दिखाऊपणा : नियोजनाचा अभाव
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहरात बिबटय़ाची दहशत निर्माण झाली असून तब्बल 18 दिवस त्याने साऱयांचीच झोप उडविली आहे. केवळ बेजबाबदारपणा आणि गांभीर्य नसल्याने हातात आलेला बिबटय़ा पोलीस व वनखात्याच्या पथकाला चकवा देऊन अखेर निसटला. बिबटय़ाला पकडण्यासाठी क्लब रोडवर पोलीस व वनखात्याचे पथक तैनात केले होते मात्र त्यांच्या समोरुन बिबटय़ा पसार झाला. यामुळे बेळगाव शहरासह परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या बिबटय़ाच्या दहशतीने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर या परिसरातील वसाहतींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र जणू आपले काही देणेघेणेच नाही, अशा पद्धतीने वनविभाग आणि जिल्हा प्रशासन वागत आहे. याचा प्रत्येय सोमवारी बेळगावकरांना आला.
वनविभाग व पोलीस प्रशासन खडबडून जागे
सोमवारी पहाटे बिबटय़ा रस्त्याकडून धावताना दिसला. एका वाहनचालकाने त्याचे चक्क व्हिडीओ चित्रीकरण केले. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर वनविभाग व पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. मात्र कोणतेच नियोजन नसताना केवळ एक ते दोन जाळी घेऊन बिबटय़ाला पकडण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाचा हा प्रयत्न आता चेष्टेचाच विषय ठरला आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
बिबटय़ा निसटला
18 दिवसांपासून रेसकोर्स परिसरात दहशत माजविलेला बिबटय़ा वनखात्याच्या हातातून सोमवारी निसटला. त्यामुळे पुन्हा एकदा या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पहाटे क्लब रोड मार्गावर बिबटय़ाचे दर्शन झाल्यानंतर तातडीने वनखाते आणि पोलीस यंत्रणेने बंदोबस्त वाढविला होता. मात्र, बिबटय़ाला जेरबंद करण्यात वनखात्याला पुन्हा एकदा अपयश आले आहे. शिवाय बिबटय़ा रेसकोर्स परिसरातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबरोबर बिबटय़ाबाबत असलेली भीती मात्र कायम आहे.
जाधवनगर परिसरात 5 ऑगस्ट रोजी एका गवंडय़ावर हल्ला करून रेसकोर्स परिसरात आसरा घेतला होता. दरम्यान मागील 18 दिवसांपासून वनखाते बिबटय़ाच्या मागावर होते. मात्र बिबटय़ाची एक छबी वगळता वनखात्याच्या हाती काहीच लागले नव्हते. दरम्यान, वेगवेगळय़ा ठिकाणी बिबटय़ाचे दर्शन होत असल्याची माहिती समोर येत होती. सोमवारी सकाळी बिबटय़ा रस्ता ओलांडून जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे वनखात्याची तारांबळ उडाली. त्यानंतर 10 वाजता बिबटय़ाचे रस्त्याशेजारी दर्शन झाले. दरम्यान वनखाते आणि पोलीस खात्याने बॅरिकेड्स लावून बंदोबस्त वाढविला. शिवाय शेजारी असलेल्या झाडा-झुडूपांत बिबटय़ाचा शोध सुरू केला. दरम्यान बिबटय़ाने रस्ता ओलांडत लोखंडी कुंपणाखालून रेसकोर्स परिसरात पलायन केले. त्यानंतर रेसकोर्स परिसरात शोधमोहीम हाती घेण्यात आली. मात्र बिबटय़ाचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे बिबटय़ाबाबत पुन्हा धास्ती निर्माण झाली आहे.
वनविभागाचा केवळ दिखाऊपणा
बिबटय़ाची दहशत इतकी वाढली असताना वनविभागाने मात्र केवळ 6 पिंजरे रचून दिखाऊपणा केला आहे. यातच कहर म्हणजे पोलिसांनी चक्क ढोल आणि फटाक्मयांचा आवाज करून दिखाऊपणा केला आहे. खरोखरच ही खेदाची गोष्ट आहे. कारण अशाप्रकारे ढोल वाजवून किंवा फटाके उडवून बिबटय़ा सापडणार नाही, हे कोणीही सांगू शकते. पण केवळ आम्ही बिबटय़ाचा शोध घेत आहोत, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न या दोन्ही विभागांनी केला आहे.
वनखात्याची यंत्रणा असक्षम
बिबटय़ाला पकडण्यासाठी वनखात्याची यंत्रणा सक्षम नसल्याने बिबटय़ा अद्याप हाती लागला नाही. बिबटय़ाला पकडण्यासाठी मनुष्यबळ आणि इतर साहित्य कमी पडत असल्याने बिबटय़ा वनखात्याच्या हातातून निसटला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांतून वनखात्याच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिवाय वनखाते बिबटय़ाला पकडण्यात अपयशी ठरत असल्याचे समोर येत आहे. बिबटय़ाला पकडण्यासाठी पोलीस यंत्रणेची मदत देखील घेतली जात आहे. मात्र पोलिसांना वन्यप्राण्यांबाबत कोणतेही प्रशिक्षण नसल्याने शोधमोहीम अयशस्वी होताना दिसत आहे. त्यामुळे वनखात्याला आता प्रशिक्षित पथकाला पाचारण करावे लागणार आहे.
मागील काही दिवसांपासून बिबटय़ाच्या मागावर असलेल्या वनखात्याला अपयश आले आहे. दरम्यान पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बिबटय़ाच्या शोधासाठी मुधोळ हाऊंड श्वानाची मदत घ्यावी, अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे आता वनखाते रेसकोर्सच्या मैदानात मुधोळ श्वान उतरविणार का? हेच पहावे लागणार आहे. सोमवारी वनखात्याच्या हातून बिबटय़ा निसटल्याने बिबटय़ाला पकडण्यासाठी वनखाते आता कोणते उपाय राबविणार किंवा कोणती कारवाई करणार? याकडेही लक्ष लागले आहे.
रेसकोर्स परिसरात दहशत माजविलेला बिबटय़ा सातत्याने चकवा देत आहे. शिवाय तब्बल 18 दिवसांनंतरही वनखात्याच्या हाती लागला नाही. त्यामुळे या शोधमोहिमेत वनखाते वारंवार अपयशी ठरताना दिसत आहे. सोमवारी बिबटय़ा रेसकोर्स परिसरातच असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय वनखात्याच्या हातातूनही तो निसटला आहे. त्यामुळे पुढील कारवाई काय होणार आणि बिबटय़ा कधी सापडणार आहे? या विवंचनेतच सारी जनता आहे.
तानाजी पाटील शोधमोहिमेत सहभागी
वनक्षेत्र आणि वन्यप्राण्यांविषयी अधिक माहिती असलेले खानापूर येथील तानाजी पाटील हे देखील शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत. खानापुरात वाघांचा वावर वाढला होता त्यावेळी तानाजी पाटील यांची मदत झाली होती.
बिबटय़ाला लवकरच जेरबंद करू : मल्लिनाथ कुसनाळ ( एसीएफ वनखाते)
पहाटे बिबटय़ाचे व्हिडिओ समोर येताच शोधमोहीम सुरू केली. मात्र बिबटय़ा हातून निसटला. त्यानंतरही दिवसभर शोधमोहीम सुरु होती. बिबटय़ाने रेसकोर्स परिसरातच आसरा घेतला असून त्याला लवकरच जेरबंद केले जाणार आहे.
24 तासांत बिबटय़ाला जेरबंद करा
वनमंत्री उमेश कत्ती यांनी अधिकाऱयांना केल्या सूचना
बेळगाव ः बेळगाव शहरात मागील काही दिवसांपासून बिबटय़ाने दहशत माजविली असली तरी वनमंत्री उमेश कत्ती यांचे याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत होती. सोमवारी वनखात्याच्या हातातून बिबटय़ा निसटल्याने बेजबाबदारपणाचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह नागरिक संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वनमंत्री उमेश कत्ती यांनी वनखात्याच्या कार्यालयात तातडीने बैठक घेतली. शिवाय येत्या चोवीस तासांत बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वन खात्याच्या अधिकाऱयांना सूचना केल्या. या बिबटय़ाचे सोमवारी दर्शन झाल्याने वनखाते आणि पोलीस यंत्रणा खडबडून जागे झाली आहे. बिबटय़ाबाबत परिस्थिती जाणून घेऊन बिबटय़ाला पकडण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्याच्या सूचनादेखील अधिकाऱयांना केल्या. शिवाय बिबटय़ाला पकडण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांनादेखील प्राचारण केले जाईल, असे सांगितले. शिवाय बिबटय़ा हा वन्यप्राणी आहे. यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱयांसह बंदुकीद्वारे गुंगीचे इंजेक्शन देणाऱया तज्ञांनादेखील बोलविण्याच्या सूचना केल्या.
नागरिकांनी सयंम ठेवावा
जिल्हय़ात विविध ठिकाणी बिबटय़ाने दहशत माजविली असली तरी अद्याप कोणतीही हानी झाली नाही. मानवी वस्तीत वन्यप्राणी येण्याची ही पहिली घटना नसून यापूर्वी वन्यप्राणी नागरी वस्तीत आले होते. बेळगाव शहर परिसरात बिबटय़ा पहिल्यांदाच आला आहे. मात्र अलीकडे मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा वावर का वाढला आहे? या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले नाही. मात्र जिल्हय़ात विविध ठिकाणी वन्यप्राणी आढळून येत आहेत. शिवाय रेसकोर्स परिसरातील बिबटय़ाला लवकरच जेरबंद केले जाईल. नागरिकांनी शांत आणि सयंम ठेवावा, असे आवाहन देखील वनमंत्री उमेश कत्ती यांनी केले आहे.