बिहारमध्ये 12 वीच्या निकालाची प्रतीक्षा केली जात आहे. तेथे उत्तरपत्रिका तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे. याचदरम्यान 12 वीच्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांना दिलेली उत्तरे वाचून संबंधित शिक्षकाला हसू अनावर झाले आहे. काही जणांनी मुलगी समजून तर काहींनी आजाराचे निमित्त पुढे करत पास करण्याची विनवणी केली आहे. तर काही विद्यार्थ्यांनी कोरोना संकटामुळे शिक्षणाला फटका बसल्याचे सांगत उत्तीर्ण करण्याची विनंती केली आहे.
नवादा जिल्हय़ाच्या 4 केंद्रांवर 12 वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांनी प्रश्नांच्या उत्तरादाखल अशा बाबी लिहिल्या आहेत, जे वाचून संबंधित शिक्षकाला हसावे की रडावे हेच समजले नाही. या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वैयक्तिक समस्यांचा उल्लेख उत्तरादाखल केला आहे.
परीक्षार्थींच्या शब्दांमध्ये त्यांची उत्तरे…
सर तुम्हाला विनंती आहे. चांगल्याप्रकारे उत्तरे लिहू शकलो नाही, प्रकृती खूपच खराब होती, ताप आला होता.
सर तुमची मुलगी समजून चांगले गुण प्रदान करा.
सर तुम्हाला नमस्कार करते. जशी तुम्हाला मुलगी आहे. तशीच मी देखील तुमचीच मुलगी आहे. सर अत्यंत गरीब कुटुंबातून आले असून माझी स्थिती समजून घ्या.
महाशय, मी हनुमानाचा भक्त आहे. मी तुमच्या पाया पडू शकतो, पण चांगले गुण द्या.
विद्यार्थ्यांचे अजब युक्तिवाद
बहुतांश विद्यार्थ्यांनी अनुत्तीर्ण न करण्याचे आवाहन स्वतःच्या उत्तरपत्रिकांमध्ये केले आहे. काही जणांनी आजारी असल्याने, कोरोनाबाधित असल्याने अभ्यास करू शकलो नसल्याचा उल्लेख केला आहे. काही उत्तरपत्रिकांमध्ये उत्तरे लिहिण्याऐवजी प्रश्नालाच वारंवार लिहिण्यात आले आहे. काही जणांनी उत्तरपत्रिकेत स्वतःचा मोबाईल क्रमांक लिहित स्वतःची समस्या सांगण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करण्याची विनंतीही केली आहे. काही विद्यार्थ्यांनी विवाह मोडू नये याकरता पास करण्याची विनंती केली आहे. माझा 26 मे रोजी विवाह होणार आहे, नापास झालो तर काय घडेल हे माहित नाही. याचमुळे सर पास करा असे एका विद्यार्थ्याने लिहिले आहे.