प्रतिनिधी /बेळगाव
बुडा कार्यालयामध्ये विकासासंदर्भात तसेच विविध योजना राबविण्याबाबत बैठका घेण्यात आल्या नाहीत. केवळ लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येथील अधिकारी काम करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. अनेकांना घरे नाहीत, एक लाखाहून अधिक लोकांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. तेव्हा येथील कारभार तातडीने सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा विविध पक्षांच्या नेत्यांनी प्रादेशिक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून दिला आहे.
बुडाचे आयुक्त हे गेल्या काही वर्षांपासून त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. इतर अधिकाऱयांची नियुक्ती झाली तरी राजकीय दबाव आणून पुन्हा ते रुजू होत आहेत. हे अत्यंत गंभीर आहे. कणबर्गी येथील 61 स्कीम राबविण्यासाठी जमीन घेण्यात आली.
या घटनेला जवळपास दहा वर्षे झाली आहेत. मात्र अद्यापही स्कीम राबविण्यात आली नाही. केवळ राजकीय दबावाखाली हे अधिकारी काम करत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.
बुडाकडे अनेकांनी अर्ज केले आहेत. त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. बुडाकडून कोणतीच विकासकामे होत नाहीत. बैठक देखील घेतली जात नाही. यामागचे गौडबंगाल काय? त्याची चौकशी करून तातडीने संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर या ठिकाणी राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. तो देखील थांबविणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत कोणत्याच प्रकारे योग्य कामे होत नाहीत. सर्व कामे अर्धवट आहेत. याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
प्रादेशिक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन परिवारचे सुजित मुळगुंद, बांधकाम संघटनेचे जिल्हाध्यक्ष एन. आर. लातूर, ऍड. आर. पी. पाटील, ऍड. एस. आर. मोरबद, राजू टोपण्णावर, प्रमोद पाटील, ऍड. एस. सी. कांबळे, मल्लेश चौगुले, सागर चौगुले, बी. एस. एस. आंबेडकरवादचे महांतेश तळवार, निलकंठ गौडर, संतोष हलगेकर, श्रीनिवास राव, विजय पाटील यांच्यासह आपचे कार्यकर्ते उपस्थित होते.