नवी दिल्ली
ऑनलाईन ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीदरम्यान सर्व्हर क्रॅश झाल्याने भारत व रशिया यांना स्पर्धेतील संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. ऑनलाईन बुद्धिबळ हा फक्त व्यावहारिक पर्याय आहे, त्याला पूर्ण सुरक्षित पर्याय मानता येणार नाही, हे यामुळे स्पष्ट झाले. भारतीय संघाने अपील केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
रविवारी अंतिम लढतीत निहाल सरिन व दिव्या देशमुख हे वेळ संपत असल्याने पराभवाच्या उंबरठय़ावर होते. पण, नंतर त्यांनी पटावरील आपली स्थिती मजबूत केली. याचदरम्यान सर्व्हर क्रॅश झाले आणि अथक प्रयत्नानंतरही ते सुरु करता आले नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेने दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले.
अचानक सर्व्हर क्रॅश झाल्याने देशातील विविध भागात, जिथून भारतीय बुद्धिबळपटू खेळत होते, त्यांच्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अगदी भारतीय संघाचा बहिस्थ कर्णधार नारायणन श्रीनाथ यानेही हाच अनुभव विशद केला. ‘काय होत होते, ते मलाही कळत नव्हते आणि या परिस्थितीवर कशी मात करायची, याची कल्पनाही कोणालाच नव्हती’, असे तो एका वेबसाईटशी बोलताना म्हणाला.
जेव्हा इंटरनेट कनेक्शन अचानक बंद झाले, त्यावेळी भारतीय संघ ऐतिहासिक विजयाच्या उंबरठय़ावर होता.
कनिष्ठ गटातील सरिन व देशमुख हे दोन्ही खेळाडू आपले रशियन प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरले होते. देशमुखने शुवालोव्हाविरुद्ध उत्तम चक्रव्यूह रचला होता तर सरिनला इसिपेंकोविरुद्ध किमान बरोबरी तरी निश्चितच अपेक्षित होती. कोनेरु हंपीने अतिशय महत्त्वपूर्ण विजय त्यापूर्वी मिळवला होता. पण, अचानक इंटरनेटची समस्या आली आणि आर्बिटरनी भारतीय बहिस्थ कर्णधार श्रीनाथला 15 मिनिटे प्रतीक्षा करण्याची सूचना केली.
पुढील 15 मिनिटात इंटरनेट सुरु होऊ शकले नाही आणि यादरम्यान भारतीय पथकाने आपली तक्रार नोंदवणारे छोटे टिपण तयार केले. पुढील 30 मिनिटे ही भारतीय खेळाडूंसाठी जणू 30 तासांसारखे होते. चेन्नईतील आपल्या निवासस्थानाहून ऑनलाईन लढत देणाऱया प्रज्ञानंद अचानक सर्व्हर क्रॅश झाल्याने गोंधळला तर त्याच्या बहिणीला शब्दही फुटत नव्हते. थ्रिस्सूर येथून खेळणाऱया सरिनची स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती.
‘त्या काही मिनिटात इतका तणाव होता की, त्यावर कसे व्यक्त व्हायचे, हे देखील मला सूचत नव्हते’, असे प्रज्ञानंद या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाला. प्रज्ञानंद-ऍलेक्सेय साराना यांची लढत बरोबरीत राहिली. पण, ही लढत आपण जिंकू शकलो असतो, असे मत प्रज्ञानंदने पुढे व्यक्त केले.