मात्र 144 कलमानुसार जमावबंदी आदेश लागू
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार आणखी दोन आठवडे लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मात्र, यासाठी नवी मार्गसूची जारी करण्यात आली असून त्यानुसार बेळगावसह 13 जिल्हय़ांचा ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. सोमवारपासून लॉकडाऊन काही अंशी शिथिल करत असतानाच जिल्हा प्रशासनाने 144 कलम जारी करून जमावबंदीचा आदेश लागू केला आहे.
बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण व म्हैसूर ही रुग्णसंख्या अधिक असलेले तीन जिल्हे रेड झोनमध्ये तर बेळगाव, विजापूर, गुलबर्गा, बागलकोट, मंडय़ा, बळ्ळारी, धारवाड, मंगळूर, बिदर, चिक्कबळ्ळापूर, गदग, कारवार व तुमकूर हे जिल्हे ऑरेंज जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
रविवारी राज्याचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी यासंबंधी एक आदेश जारी केला आहे. दावणगेरे, उडुपी, चामराजनगर, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, हासन, हावेरी, कोडगू, कोलार, कोप्पळ, रायचूर, शिमोगा, रामनगर व यादगिरी हे चौदा जिल्हे ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
शनिवारी बेळगावचे पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनीही बेळगावचा समावेश ऑरेंज झोनमध्ये असल्याचे सांगितले होते. आता सोमवारपासून ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही अंशी लॉकडाऊन शिथिल असणार आहे. या दोन्ही झोनमध्ये सरकारी कार्यालये सुरू होणार आहेत. कर्मचाऱयांनी शंभर टक्के हजेरी लावण्याची सूचना मुख्य सचिवांनी दिली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी एका पत्रकाद्वारे बेळगावचा समावेश ऑरेंज झोनमध्ये झाल्याची माहिती दिली आहे. 4 मे पासून केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार ऑरेंज झोनला ज्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत; त्या असणार आहेत. आर्थिक व व्यावसायिक उपक्रमाबरोबरच रहदारीला मुभा असणार आहे. याबरोबरच 4 मे पासून दोन आठवडे लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जमावबंदीची मर्यादा
जिल्हा दंडाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी 3 मे च्या मध्यरात्रीपासून 17 मे च्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. कोरोना थोपविण्यासाठी सीआरपीसी कलम 144 अन्वये हा आदेश असणार आहे. रोज सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत पाचहून अधिक जण फिरू नये, असा आदेश देण्यात आला आहे. बेळगाव शहर व जिल्हय़ात हा आदेश लागू असणार आहे. सायंकाळनंतरची वर्दळ थांबविण्यासाठी या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
लॉकडाऊन-3 ची अंमलबजावणी
तिसऱया टप्प्यातील लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना नागरिकांना कोरोना थोपविण्यासाठी काही पथ्ये स्वयंप्रेरणेने पाळावी लागणार आहेत. ऑरेंज झोनमुळे बेळगाव जिल्हय़ात लॉकडाऊन अंशतः शिथिल असणार आहे. त्यामुळे वर्दळही वाढणार आहे. वर्दळीच्या वेळी मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरने हात धुवून घेणे, सामाजिक अंतर राखणे आदी पथ्ये पाळावी लागणार आहेत. बेळगाव जिल्हय़ात 73 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धास्ती अजूनही कमी झालेली नाही. लॉकडाऊन शिथिल झाले म्हणून अनावश्यक गर्दी टाळणे जरुरीचे आहे.