सर्व दुकाने सायंकाळी 5 पर्यंत सुरू- 50 टक्के क्षमतेने बससेवेलाही हिरवा कंदील- दररोज नाईट कर्फ्यु
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असणाऱया बेळगावसह राज्यातील 16 जिल्हय़ांमध्ये अनलॉक 2.0 जारी करण्यात आला आहे. हा आदेश येत्या सोमवारपासून 5 जुलैपर्यंत (दोन आठवडे) जारी राहणार आहे. शिवाय, विकेंड कर्फ्यु आणि दररोज नाईट कर्फ्युही असणार आहे. दुसऱया टप्प्यात अनलॉक झालेल्या जिल्हय़ांमधील कडक निर्बंध आणखी काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असून सर्व दुकाने सकाळी 6 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी प्रवासी वाहनसेवा, कार्यालयेही 50 टक्के जणांच्या उपस्थितीत सुरू होतील.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बेंगळूरमधील आपले गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे शनिवारी सायंकाळी कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असणारे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत अनलॉक 2.0 ची घोषणा केली. कोरोनाचा पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांच्या खाली आलेल्या बेळगावसह कारवार, बागलकोट, हावेरी, गुलबर्गा, मंडय़ा, कोप्पळ, चिक्कबळ्ळापूर, तुमकूर, कोलार, बेंगळूर शहर, गदग, रायचूर, रामनगर, यादगीर आणि बिदर जिल्हय़ात सोमवारपासून अनलॉक 2.0 जारी होणार आहे. या जिल्हय़ांमध्ये सर्व दुकाने सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. हॉटेल बार, रेस्टॉरंट, क्लब, कार्यालये, सायंकाळी 5 पर्यंत टक्के ग्राहकांच्या प्रवेशासह सुरू करता येतील. मात्र, येथे मद्यपान व एसीचा वापर करता येणार नाही. सर्व प्रकारची दुकाने सायंकाळी 5 पर्यंत कोरोना नियमांचे पालन करून सुरू ठेवता येतील.
मॉल, प्रार्थनास्थळे बंद
तथापि मॉल, सर्व प्रार्थना स्थळे बंद राहतील. सार्वजनिक कार्यक्रम, सभा-समारंभांच्या आयोजनावरही यापूर्वीप्रमाणेच निर्बंध असणार आहे. शाळा-महाविद्यालये बंद राहणार असली तरी शैक्षणिक पूर्वतयारीसाठी शिक्षकांना शाळेत ये-जा करता येईल. सुरक्षेच्या दृष्टीने स्वीमिंग पूल, चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत.
सरकारी आणि खासगी कार्यालये 50 टक्के कर्मचाऱयांच्या उपस्थितीत सुरू करता येतील. मात्र, अत्यावश्यक सेवा पुरविणारी सरकारी कार्यालये सर्व कर्मचाऱयांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. बाहेरील प्रदेशात चित्रपट, मालिकांच्या चित्रिकरणाही परवानगी देण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून बंद असणारी रिसॉर्टस्, लॉजही दुसऱया टप्प्यातील अनलॉकमध्ये सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. येथे देखील क्षमतेच्या 50 टक्केच ग्राहकांना प्रवेश देता येईल.
जीम, क्रीडांगणेही सुरू
दोन महिन्यांपासून बंद असणारी जीम देखील सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे व्यायामपटूंना दिलासा मिळाला आहे. येथे देखील 50 टक्के जणांनाच प्रवेश देता येणार आहे. शिवाय येथील एसींचा वापर न करण्याची अटही असणार आहे. क्रीडांगणेही प्रेक्षकांशिवाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धा भरविणे, सराव करण्यास क्रीडापटूंना अनुकूल होणार आहे.
मागील आठवडय़ात 16 जिल्हय़ांमधील पॉझिटिव्हीटी दर 5 टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे येथे अनलॉक 2.0 जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्हय़ांमधील हा दर 5 ते 10 टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे येथे यापूर्वीचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. हासन, उडुपी, धारवाड, बळ्ळारी, मंगळूर, शिमोगा, चामराजनगर, चिक्कमंगळूर, दावणगेरे, बेंगळूर ग्रामीण, कोडगू, चित्रदुर्ग आणि विजापूर जिल्हय़ांमध्ये 11 जून रोजी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे जारी केलेली शिथिलता मात्र राहणार आहे. म्हणजेच तेथे केवळ सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेतच मर्यादित व्यवहार सुरू राहतील. म्हैसूरमध्ये पॉझिटिव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा अधिक आल्याने तेथे लॉकडाऊन कायम असणार आहे.
मद्यविक्री सायंकाळी 5 पर्यंत, मात्र केवळ पार्सल
राज्य सरकारने मद्य खरेदीसाठी सायंकाळी 5 पर्यंत वेळ वाढवून दिली आहे. केवळ पार्सल नेण्याची मुभा देण्यात आली आहे. बारमध्ये मद्यप्राशन करण्याची परवानगी मात्र देण्यात आलेली नाही. हॉटेल, क्लब, रेस्टॉरंट मद्यपान वगळता सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शिवाय याकरिता क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच एका वेळी प्रवेश देता येईल. शिवाय वातानुकूलित व्यवस्था (एसी) बंद ठेवण्याची अटही असणार आहे, असे राज्य सरकारने आदेशात स्पष्ट केले आहे.
विवाहासाठी 100 जणांची उपस्थिती
विवाह समारंभांसाठी असणारे नियम अणखी शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे विवाह समारंभात कमाल 100 जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. ही शिथिलता दुसऱया टप्प्यात अनलॉक जारी झालेल्या जिल्हय़ांसाठी लागू आहे. मात्र, मास्कचा वापर, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी विवाहासाठी केवळ 40 जणांच्या उपस्थितीला परवानगी होती.
दररोज नाईट कर्फ्यु अन् विकेंड कर्फ्युही
अनलॉक असणाऱया जिल्हय़ांमध्ये दररोज रात्री 7 ते सकाळी 5 पर्यंत नाईट कर्फ्यु जारी असणार आहे. या कालावधीत आरोग्य सेवा, मेडिकल व मालवाहतूक वगळता सर्व व्यवहार आणि नागरिकांच्या संचारावर निर्बंध असणार आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यभरात शुक्रवारी रात्री 7 ते सोमवारी सकाळी 5 पर्यंत विकेंड कर्क्युची अंमलबजावणी केली जाणार आहे. मागील आठवडय़ात पहिल्या टप्प्यात अनलॉकची घोषणा झाल्यानंतर जारी करण्यात आलेले हे निर्बंध दुसऱया टप्प्यातील अनलॉकमध्येही असणार आहेत.