आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावसाठी सध्या रोज 25 हजार लसपुरवठा केला जात आहे. आता आणखी 25 हजार अतिरिक्त लसपुरवठा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शनिवारी सुवर्ण विधानसौधमध्ये पूर व कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत जाहीर केले. ब्लॅक फंगस बाधितांना इस्पितळांतून डिस्चार्ज झाल्यानंतरही त्यांना घरी औषधे पुरविण्याचा निर्णयही घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आढावा बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी बेळगाव जिल्हय़ात यापुढे रोज 40 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या 25 हजारप्रमाणे लसपुरवठा केला जात आहे. अतिरिक्त लसींसाठी जिल्हाधिकाऱयांनी प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली.
नव्याने नियुक्ती करण्यात आलेले डॉक्टर सेवेत हजर झाले नाहीत तर त्यांना नोटीस पाठवाव्यात. जिथे कामाचा ताण अधिक आहे, जिथे अधिक गरज आहे त्या ठिकाणी नियुक्ती प्राधान्याने करावी, अशी सूचना आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांना केली. बेळगाव हा सीमेवरचा जिल्हा आहे. म्हणून जिल्हय़ात कोरोना तपासणी वाढवावी. चेकपोस्टना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी नियमित भेटी देऊन येथील परिस्थितीची पाहणी करावी. रेल्वे स्थानकावर कोविड तपासणी सुरू करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना सूचित केले.
शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर भरविण्यात यावे
बेळगाव हा आकाराने मोठा जिल्हा आहे. नव्या तालुक्मयांतही इस्पितळ सुरू करून वैद्यकीय सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्यात येणार आहे. कोरोना किंवा कुपोषणामुळे लहान मुलांना त्रास होऊ नये. तिसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्य केंद्रांच्या पातळीवर प्रत्येक शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर भरविण्यात यावे. उपचाराची गरज असणाऱया मुलांना त्वरित उपचार द्यावेत. कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर व कर्मचाऱयांना पगारापोटी आवश्यक अनुदान त्वरित दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.
यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, विधान परिषदचे मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ, विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी व्यासपीठावर होते. जिल्हय़ातील आमदार, खासदार व अधिकारी बैठकीत सहभागी होते. लोकप्रतिनिधींनी कोरोना परिस्थितीबरोबरच पूर आणि पुरामुळे झालेल्या वाताहतीची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण त्वरित पूर्ण करावे. केंद्र सरकारला नुकसानीसंबंधीचा निश्चित अहवाल पाठविता येणार आहे, असेही बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना सूचित केले.