पिकांचे नुकसान झाल्यानंतर बळ्ळारी नाल्याची अधिकाऱयांकडून पाहणी
प्रतिनिधी /बेळगाव
कोणतीही समस्या असताना त्या समस्येकडे दुर्लक्ष करायचे, त्यानंतर मोठा अनर्थ किंवा नुकसान झाल्यानंतर पाहणी करायची, असा उपक्रम नेहमीच अधिकाऱयांचा सुरू असतो. तशाच प्रकारे बळ्ळारी नाला आणि शेतकऱयांच्या अवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यानंतर आता दमदार पाऊस झाल्यामुळे कृषी अधिकाऱयांना जाग आली. त्यांनी बळ्ळारी नाल्याला भेट देऊन पाहणी केली आणि शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घेतले. ‘बैल गेला अन् झोपा केला’ या म्हणीचा प्रत्ययच यानिमित्ताने बेळगावकरांना आला.
बळ्ळारी नाला हा शेतकऱयांसाठी नुकसानीचाच ठरत आहे. दरवषी बळ्ळारी परिसरातील हजारो एकर जमिनीला फटका बसत आहे. या नाल्याची खोदाई करावी, अशी आरोळी वारंवार शेतकरी मारत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अधिकाऱयांना शेतकऱयांच्या नुकसानीशी सोयरसुतक नसल्यामुळे त्याकडे डोळेझाक होते. मात्र, अशा दमदार पावसामुळे शेतकऱयाचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होते.
बळीराजा वर्षभर काबाडकष्ट करतो. केवळ आपणच नाही तर आपल्या कुटुंबासह शेतामध्ये राबतो. खरीप पेरणीवेळी मशागत करून भातपीक पेरणी केली असताना आता हे भातपीक पाण्याखाली गेले आहे. बळ्ळारी परिसरातील जवळपास 500 हून अधिक एकरमधील भातपीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नुकसान झाल्यानंतर एकरी केवळ 800 ते 1000 रुपये देऊन शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम मात्र इमानेइतबारे केले जाते.
शुक्रवारी येळ्ळूर रस्त्यावरील बळ्ळारी नाल्याला जिल्हा कृषी संचालक एस. एस. पाटील, उपसंचालक एच. डी. कोळेकर, आर. बी. नायकर, वजेश्वरी कुलकर्णी आणि गुडीमनी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱयांसोबत चर्चा केली. तेव्हा शेतकऱयांनी आम्हाला तुमची तुटपुंजी नुकसानभरपाई नको, या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढा, अशी मागणी केली आहे.