अगदी नाइलाज झाला म्हणून परवा बँकेत गेलेलो. दारातच रक्षकाने अडवले आणि समोरच्या टेबलवर ठेवलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीकडे बोट दाखवलं. तळहातावर दोन थेंब घेऊन मी हात चोळले आणि माझं काम केलं. काम उरकून परत निघालो. तर एक मास्कधारी सद्गृहस्थ बाटलीखाली उजवा हात धरून डाव्या हाताने बाटली प्राणपणाने दाबत होते. त्या द्रवाने ओंजळ भरल्यावर त्यांनी दोन्ही हात, मनगटे पुसून घेतली, मग तेच तळहात चेहऱयावरून फिरवले. आणि मग ते हव्या असलेल्या काउंटरकडे वळले. मजा वाटली. पन्नास रुपये किमतीची ती बाटली, घरात असती तर किती काटकसरपूर्वक वापरली असती. त्यांच्या मागोमाग आणखीन एका महिलेने असेच भरपूर औषध हातावर ओतून घेतले. दोन्ही हातांना दंडांपर्यंत चोळले. मग पुन्हा थोडेसे घेऊन डोक्मयावर चोळले. मी कारण विचारल्यावर म्हणाली, “डोक्मयात कोरोना गेला असेल तर?’’ तिचा सवाल निरुत्तर करणारा होता.
मनात आलं, लोकांची अशीच भावना असेल तर… पूर्वी जुने वाडे असायचे. पुढे चौक असायचा. चौकात दाराजवळ दगडी डोण असे. बाहेरून आलेला पाहुणा डोणीतून पाणी घेऊन हात-पाय-तोंड स्वच्छ धुवून मगच दिवाणखान्यात प्रवेश करायचा. लोकांनी असंच वागायचं ठरवलं तर बँकांना आणि इतर कचेऱयांना दारांमध्ये सॅनिटायझर भरलेले हौद आणि तांबे ठेवणे भाग पडेल. तो खर्च भरून काढण्यासाठी ग्राहकांच्या व्याजदरात कपात किंवा कर्जावरील व्याजदरात वाढ करावी लागेल.
लोक असे फुकटेपणा का करतात? लहानपणी पोस्टात जायचो तेव्हा तिथल्या शाईच्या वाळलेल्या दौती, डिंक नसलेल्या वाटय़ा बघायचो. त्या तशा असण्याचे कारण आता समजते आहे.
कोरोना आणि बरेच दिवस थांबणार असेल तर काही बँका, कचेऱया, दुकानदार सॅनिटायझरमध्ये पाणी कालवू शकतील. त्यापेक्षा एक कल्पना सुचवावीशी वाटते. सध्या अनेक ठिकाणी रेल्वेवाले, लोकप्रतिनिधी वगैरेंकडून मोफत वायफाय दिले जाते. त्यांनी वायफायऐवजी सॅनिटायझर पुरवावे.
हे जमणार नसेल आणि लोक देखील फुकटेपणा सोडणार नसतील तर एक गोष्ट नक्की घडेल. बँकेत ग्राहकांसाठी बॉल पेन ठेवलेले असते. ग्राहकांनी ते चोरू नये म्हणून त्याला दोरी बांधलेली असते. बँकवाले सॅनिटायझरच्या बाटलीचं तोंड अगदी बारीक करून तिला दोरी बांधून ठेवू शकतील.