अभिनेत्री कंगना राणावतच्या बोलघेवडेपणाला आता काही मर्यादा उरलेली नाही. आपण काय बोलतो आहोत, कोणाबद्दल बोलतो आहोत, त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचा विचार न करता सातत्याने गरळ ओकण्याचे काम ती करत आली आहे. एखाद्या राजकीय पक्षाचे समर्थन करणे किंवा एखाद्या राजकीय पक्षावर टोकाची टीका करणे हे समजून घेतले जाऊ शकते. पण जेव्हा अशी बेताल वक्तव्ये देशाच्या स्वातंत्र्याबाबत केली जातात, तेव्हा अशा व्यक्तीचे डोके तपासणे गरजेचे बणून जाते. आता कंगणाचे डोके तपासून स्वतःचे डोके कोण फिरवून घेणार? हा प्रश्न आहेच. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करणाऱया अशा व्यक्तीला अद्दल घडवण्याची आवश्यकताच आहे. नुकताच भारत सरकारने तिचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. अभिनेत्री म्हणून केलेल्या कामगिरीसाठी हा पुरस्कार होता असे म्हणावे तर त्या समारंभानंतर तीनच दिवसात तिने आपली लायकी सिद्ध केली आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. ज्या हातात पद्म पुरस्कार सोपवला, त्या हातात बेडय़ा घालण्याची वेळ आली असून ते पुण्यकर्म देशातील कोणती तपास यंत्रणा करणार? हा प्रश्नच आहे. पद्म पुरस्कार मिळाला म्हणून टाइम्स नाऊने कौतुकाने आपल्या विशेष समारंभात तिची मुलाखत घेतली. तर त्या मुलाखतीत ती चक्क भकलली. विशेष म्हणजे त्या वक्तव्यावर टाळय़ा वाजवणारे काही महाभागही तेथे होते. देशाला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होते, खरे स्वातंत्र्य 2014 सालीच मिळाले आहे असे ती म्हणाली. आपण एखाद्या राजकीय पक्षाचे समर्थक आहोत हे वारंवार दाखवून देणे वेगळे आणि तसे काही दाखवून देण्याच्या नादात देशाबद्दल, देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या महान व्यक्तिमत्त्वांबद्दल आपण अपमानजनक वक्तव्य करत आहोत याचे भान न राहणे वेगळेच. भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना हा वेडेपणा म्हणावा की देशद्रोह? असा सवाल केला आहे. याबाबत केलेल्या टवीट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, कधी महात्मा गांधीजींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान, तर कधी त्यांच्या मारेकऱयांचा सन्मान आणि आता तर थेट शहीद मंगल पांडेंच्यापासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान…. या विचारांना मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह? तिच्या वक्तव्याचे असे पडसाद सर्व माध्यमातून उमटत असून ट्विटरवर एका व्यक्तीने तर, लाकडी घोडय़ावर प्लास्टिकची तलवार घेऊन विरांगणा बनणारी…. अशा शब्दात तिची निर्भत्सना केली आहे. अर्थात इतक्मया साऱया टीकेनंतर सुद्धा कंगना राणावतमध्ये फार मोठा फरक पडेल असं वाटत नाही. लॉकडाऊनच्या काळात तिने असंख्य वादग्रस्त वक्तव्ये केली. कोरोनाच्या काळात लोक आपल्याला विसरू नयेत म्हणून तिची बडबडत असावी असे वाटत होते. मात्र पद्मश्री पुरस्कार मिळूनसुद्धा ती थांबायला तयार नाही. या पुढच्या काळात माध्यमांना तिची दहा अत्यंत वादग्रस्त विधाने कोणती असे सांगायची वेळ आली तर ते निवडणाऱयाच्या मानसिकतेत फरक पडेल. इतकी एकाहून एक वादग्रस्त वक्तव्ये ती करत आली आहे. बॉलिवूड पदार्पणवेळी तिला करावे लागेल संघर्षामुळे ती जेव्हा चित्रपट क्षेत्रातील घराणेशाहीबद्दल बोलत होती तेव्हा फार मोठय़ा वर्गाचे पाठबळ तिला लाभले होते. नंतर नंतर तिने स्वतःचे गुपितेही खोलायला सुरुवात केली. त्यात अंमली पदार्थाच्या आहारी जाण्यापासून विविध वक्तव्ये होती. त्या काळात ती वास्तवाचे चटके सहन केल्याने असे बोलत असावी असे लोकांना वाटत होते. पण मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना तिने पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली आणि सत्ताधारी पक्षाने तिच्या घराचे बांधकाम बेकायदा ठरवून पाडले. तेव्हाही तिचा संताप लोकांनी समजून घेतला. तत्पूर्वी अभिनेत्री शबाना आजमी बाबत वक्तव्य केले. हे फक्त शबानापुरते मर्यादित नव्हते. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातही तिने बेताल वक्तव्ये केली. अभिनेता रणबीर कपूर आणि विकी कौशल यांनी त्यांची ड्रग तपासणी करून घ्यावी असे म्हणतानाच तापसी पन्नू आणि स्वराभास्कर या दुसऱया अभिनेत्रींबद्दलही खालच्या पातळीवर जाऊन बडबडली. करण जोहरवर घराणेशाहीचा आरोप, रणबीर कपूर हा सिरीयल स्कर्ट चेसर आहे मात्र त्याला कोणी रेपिस्ट म्हणायची हिंमत करणार नाही असे वक्तव्य केले. मणीकर्निका चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली नाही म्हणून आलिया भट्टवर टीका, खुद्द राणी लक्ष्मीबाई यांच्या बद्दल पत्रकारांशी बोलताना चुकीचे उदगार काढणे अशा प्रकरणाने ती सातत्याने वादग्रस्त ठरत आली आहे. अशातूनच न्यायालयाच्या आदेशाने तिच्यावर आणि तिच्या बहिणीवर यापूर्वी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. अटक टाळण्यासाठी तिने मुंबई सोडून हिमाचल प्रदेश गाठणे पसंत केले. पोलिस चौकशीला आणि कोर्टाच्या तारखेला हजर न राहता भावाच्या लग्नाचे निमित्त सांगितले. या प्रकरणात न्यायालयाने बेताल बोलू नये अशी तंबी तिला दिली होती. पण सुधारेल ती कंगना कसली? आता सगळय़ा मर्यादा ओलांडून तिने थेट देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्यानाच भिकारी ठरवले आहे. हा प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांचा आणि हुतात्म्यांचा अपमान आहे. अशा प्रकारचा अपमान कोणत्याही व्यक्तीसाठी सहन करणे शक्मय नाही. इतर कोणत्याही राज्यांनी याबाबत कारवाई करण्यापूर्वी भारत सरकारने स्वतःहून या प्रकरणी अटकेची कारवाई करणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजूने एखाद्या व्यक्तीने वक्तव्य करणे किंवा एखाद्या अभिनेत्री बोलणे हे काही नवे नाही. कंगना राणावत ज्या प्रकारची चमचेगिरी करत आहेत अशाच प्रकारची चमचेगिरी पूर्वीच्या काळात सुध्दा काही अभिनेत्रींनी केली होती. मात्र त्या सर्वांवर मात करत कंगना राणावत थेट देशाच्या नायकांवरच घसरली आहे. या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली तरी तिला कोणीही माफ करता कामा नये.
Previous Articleसातारा बनलं कचरामुक्त शहर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.