अध्याय विसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले माझी प्राप्ती होण्यासाठी ज्ञान, सद्गुरूंच्याप्रति नि÷ा आणि योग असे तीन मार्ग आहेत त्यातील योगमार्ग अत्यंत कठीण आहे. मोठमोठे देव व ऋषिही ह्यात फसले आहेत. हे कठीण साधन सोड, तुला मी आता दुसरेच सांगतो. ते म्हणजे ‘आन्वीक्षिकी’ विद्या होय. त्यासाठी पंचमहाभूते एकमेकांवर कशी कुरघोडी करतात ते पाहणे महत्वाचे आहे. शरीर हे पंचभूतात्मक आहे हे खरे पण त्यातील ‘पृथ्वी’ ही प्रत्यक्ष पाण्यामध्ये विरून जाते. या पाण्यातील ‘जलरस’ जेव्हा ‘अग्नि’ शोषून घेतो, तेव्हा जळाचाही ऱहास होतो पण वायूच्या प्रभावाने अग्नीचे स्वरूपही मावळून जाते. पुढे ‘वायु’ आकाशात लीन होऊन फक्त आकाशच शिल्लक राहते. एकटय़ा आकाशाला काही रूपंच नसल्याने ते गुणकार्यानिशी अहंकारात शिरते. अहंकार मायेत शिरतो आणि माया परमेश्वरात लीन झाली म्हणजे मिथ्या होते. रात्र ही आपल्याच प्रौढीने अंधारच अंधार पसरून देते. तेव्हा कोटय़वधी नक्षत्रे व काजवे आपआपली तेजे मोठय़ा डौलाने मिरवतात. पण ती रात्र सूर्यापुढे आली की आपल्या कार्यासकट पार नाहीशी होऊन जाते. त्याप्रमाणेच परमेश्वराच्या अस्तित्वात माया लोपून जाते. ती मिथ्याच असल्यामुळे तिला दिसावयाला काही स्वरूपच राहात नाही. त्यामुळे तिचा मागमूसही उरत नाही. मायेने वेढलेल्या चैतन्याला ‘जीव’ हे नाव प्राप्त होते. ती मायाच नाहीशी झाली की जीवपणाही नाहीसा होतो. जीवशिवाचे भान राहात नाही. मनाचे मनपणच उडून जाते आणि सारे चैतन्यच भरून राहते व साधकांना अत्यंत समाधान वाटते. अशा रीतीने स्वरूपाचे शोधन केले म्हणजे समाधान होते. हिचे नाव ‘आन्वीक्षिकी विद्या’ असे तू जाण. ही विवेकशील लोकानाच साध्य होते. योगसाधन व स्वरूपाचा शोध या दोन्हीव्यतिरिक्त आणि सुलभ असे साधन तुला मी सांगतो. यात कष्ट फार थोडे पण योगसाधनेतील सर्व फळ मिळते. ते कोणते? तर माझी भक्ति. माझ्या रामकृष्णादि ज्या मूर्ती आहेत त्या अत्यंत प्रीतीने पूजल्या असता मी श्रीपती अत्यंत संतोष पावतो. माझे गुणानुवाद श्रवण करावेत, माझे कीर्तन करावे, माझे नामस्मरण करावे, माझेच ध्यान, माझेच भजन, असे सदासर्वदा माझेच चिंतन करीत असावे. पायांनी प्रदक्षिणा घालावयाच्या किंवा यात्रेला जावयाचे. अष्टांगांनी सर्वकाल मलाच नमन करावयाचे. अशा रीतीने अनन्यभावाने माझे भजन करून, माझ्याच भक्तीमध्ये गढून जावयाचे. असे माझ्या भक्तीमध्ये जे निमग्न होतात, त्यांना मी चक्रपाणी विकला जातो. त्याच्याहून दुसरे कोणी आवडते असे मला त्रिभुवनात नाही. अशा रीतीने माझे भजन केले तर, योगादिकांची आठवणसुद्धा करावयाला नको. उद्धवा! मी श्रीकृष्ण भक्तीशिवाय दुसऱया कशानेच सांपडावयाचा नाही.
भक्ताच्या हातून निंद्य कर्म घडत नाही. कारण, त्याचे मागेपुढे रक्षण करणारा मी असतो. तेव्हा ते निंद्यकर्म योगाकडे येते. योगामार्गात मात्र चुकून एखाद्या वेळी जे पातक घडते, त्याचा योग्याला अतिशय पश्चात्ताप होतो. ज्याप्रमाणे वणव्यामध्ये सर्प पोळावा, त्याप्रमाणे तो पातकाला भीत असतो. सिंहावर गोमाशी बसली असता तो जसे सारे अंग झाडतो, त्याप्रमाणे योगीही पातकाला पाहून रात्रंदिवस अनुताप करीत राहतो. अशावेळी त्याने सावध मन करून योगयुक्त होऊन योगबळानेच साऱया पातकांचे क्षालन करावे. हेच योग्याला प्रायश्चित्त होय. ही योगस्थिति सोडून तो जर अंगाला शेणमाती लावावयाला धावू लागेल, तर तो खरोखर नागवला म्हणून समजावे. त्याने पातकाची निष्कृती होणार नाही.
हृदयात जर अनुताप झालेला नसेल, आणि वर वर मात्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे शेणमाती लावावयाला जाईल, तर पातकांची निवृत्ती होणार नाही. लक्ष लावून माझे एक अर्ध क्षण ध्यान केले, तर कोटय़वधी पातकांचे भस्म होऊन जाते. म्हणून योग्याने इतर कोणत्याही मार्गाने प्रायश्चित्त घ्यायची गरज नाही.
क्रमशः