नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित प्रमोद भगत, तरुण तरुण व नागर कृष्णा हे भारताचे तीन पॅरा शटलर्स आगामी पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ही स्पर्धा दि. 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे.
प्रमोद भगत (एसएल-3 -स्टँडिंग लोअर लिम्ब इम्पेयरमेंट-मायनर), तरुण तरुण (एसएल-4- स्टँडिंग/लोअर लिम्ब इम्पेयरमेंट-सिव्हियर) व नागर कृष्णा (एसएच-6 -स्टँडिंग/शॉर्ट स्टेचर) यांना आगामी पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे रितसर निमंत्रण मिळाले.
यापूर्वी दुबई पॅरा स्पर्धेत 2 सुवर्ण व 1 कांस्य जिंकणाऱया भगतने पॅरालिम्पिक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्यानंतर याचा आनंद व्यक्त केला. ‘ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणे हे प्रत्येक क्रीडापटूचे स्वप्न असते. मी त्याला अपवाद असण्याचे कारण नव्हते. ऑलिम्पिकसाठी निवड झाली, याचा मला अतिशय आनंद आहे. या संधीचा पुरेपूर लाभ घेत सुवर्ण जिंकणे हे माझे यापुढील लक्ष्य असेल. सध्या मी यासाठी कसून सराव करत आहे’, असे भगत याप्रसंगी म्हणाला.
एशियन पॅरा गेम्समधील कांस्य विजेता व एप्रिलमध्ये संपन्न झालेल्या दुबई पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी सुवर्ण विजेत्या कृष्णाने देखील या निवडीमुळे प्रदीर्घ कालावधीपासूनचे आपले स्वप्न साकार होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘या स्पर्धेसाठी माझी उत्तम तयारी सुरु आहे. आम्ही दिवसभरात तीन सत्रात सराव करतो. यापुढेही कामगिरीत आणखी सुधारणा करण्यावर आमचा पूर्ण भर असणार आहे. दुबईतील स्पर्धेत मी खेळलो होतो आणि तेथे खेळातील चुका दुरुस्त करण्याची उत्तम संधी मिळाली. खेळाचे आत्मपरीक्षण करता आले. आता पॅरालिम्पिकमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन साकारण्यासाठी मला वाव असेल’, असे तो म्हणाला.
कोरोनाच्या अस्मानी संकटाचा सर्वच खेळांना फटका बसला असून क्रीडापटूंच्या सरावातही अनेक अडथळे येत राहिले आहेत. त्यातच खेळाडूंना आता बायो-बबलची बंधने पाळावी लागतात. या पार्श्वभूमीवर कृष्णाने बायो-बबलमध्ये राहणे कठीण असले तरी पदक जिंकण्यावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित असेल, असे स्पष्ट केले. ‘सध्याची सर्व परिस्थिती कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झाली आहे. पण, आपण यापासून बरेच धडे घेतले आहेत आणि यामुळे सुरक्षितता हा मुद्दा नसेल, याची मला खात्री वाटते. बायो-बबलमध्ये राहणे कठीण असले तरी सर्वोच्च कामगिरीवर आमचे लक्ष केंद्रित असणार आहे’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
अन्य भारतीय पॅरालिम्पिक ऍथलिट्समध्ये सुकांत कदम, मनोज सरकार आदींना देखील या स्पर्धेचे निमंत्रण येण्याची प्रतीक्षा आहे. दि. 16 जुलैपर्यंत पात्रता निश्चित होत जाणार आहे. यापूर्वी मागील महिन्यात पलक कोहली व पारुल परमार हे टोकियो पॅरालिम्पिक्स स्पर्धेत सहभागाची संधी मिळणारी पहिली भारतीय जोडी ठरली होती. यंदा पॅरालिम्पिक्समध्ये बॅडमिंटनचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.