लोकमान्यतर्फे ऑनलाईन भक्तीगीत-अभंगगीत कार्यक्रमाचे आयोजन : कोरोनाच्या दुष्टचक्रातही रसिकांना मेजवानी देण्याची जपली परंपरा : रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी /बेळगाव
वेळ सायंकाळची, बाहेर लय धरलेला पाऊस आणि गरमागरम चहाची लज्जत घेत विठुभक्तीत चिंब न्हाऊन निघण्याची संधी…. असा योग मंगळवारी आषाढी एकादशीला जुळून आला होता. ‘लोकमान्य’तर्फे आयोजित ऑनलाईन कार्यक्रमाने भक्तीगीते आणि अभंगगीते जिथे आहे तिथून ऐकण्याची संधी दिली आणि विठुभक्तीत समरस होणाऱया रसिकांनी कमेंट्सच्या माध्यमातून भरभरून दाद दिली. प्रत्यक्षात अवघा रंग एक झाल्याची अनुभुतीच या कार्यक्रमाने दिली.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आयोजित लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी ‘अवघा रंग एक झाला’ या ऑनलाईन भक्तीगीत-अभंगगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 5 वाजता लोकमान्य सोसायटीच्या युटय़ूब चॅनेल व फेसबुक पेज तसेच तरुण भारत न्यूज युटय़ूब चॅनेल व तरुण भारत न्यूज बेळगाव या फेसबुक पेजवरही हा कार्यक्रम पाहता आला. कोरोनाच्या दुष्टचक्रातही रसिकांना मेजवानी देण्याची परंपरा लोकमान्यने जपली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तीची भूक भागविण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला.
प्रारंभी सावळय़ा विठ्ठलाच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लोकमान्यचे संचालक प्रभाकर पाटकर, गजाननराव धामणेकर, अजित गरगट्टी, पंढरी परब, सुबोध गावडे तसेच कर्नल दीपक गुरुंग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. कार्यक्रमाला सहकार्य करणारी संस्था बेळगाव मराठी भाषाप्रेमी मंडळाच्यावतीने नितीन कपिलेश्वरकर यांच्या हस्ते सर्व संचालकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना आखून विशेष लेखन केलेल्या अनिल चौधरी यांनी आपल्या निवेदनाने कार्यक्रमाची शोभा वाढविली.
दरवर्षी लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विठ्ठल भक्तांना अभंग व भक्तीगीतांचा सुरेल असा आस्वाद घेता येतो. परंतु यावर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम होणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र ऑनलाईन कार्यक्रम सादर करून भक्ती-संगीताची ही परंपरा सुरू ठेवण्यात आली.
एकापेक्षा एक गीतांना रसिकांची दाद
श्रीधर कुलकर्णी व संतोष गुरव यांच्या नेटक्मया संगीत दिग्दर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढविली. स्वतः श्रीधर कुलकर्णी, अर्चना बेळगुंदी, श्रीवत्स हुद्दार, काजल धामणेकर, अपेक्षा कडले, सोनाली पाटील, अनिस आणि रेहान मुल्ला या गायन कलाकारांनी आपल्या गीतांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. संतोष गुरव, वैभव गाडगीळ, स्वाती हुद्दार व योगेश रामदास यांची साथसंगत न्यारी ठरली.
‘जय जय रामकृष्ण हरी’ या गजराने सुरुवात झाली. उठी उठी गोपाळा ही भूपाळी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा, आबिर गुलाल, अमृताहुनी गोड अशा एकापेक्षा एक गीतांना रसिकांनी चांगलीच दाद दिली. कमेंट्सचा पाऊस या कार्यक्रमाच्या लाईव्ह लिंक्सवर पडत होता. देव माझा विठू सावळा, निजरूप दाखवा हो, खेळ मांडीयेला वाळवंटी ठायी आदी गीतांना वाहव्वा मिळालीच, शिवाय अनेकांना घरबसल्या विठुभक्तीची संधी या गीतांनी मिळवून दिली.मध्यंतरानंतर पद्मनाभा नारायणा, मला हे दत्तगुरु दिसले, मोगरा फुलला, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे आदी गीते झाली. युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ही आरती, ज्ञानेश्वर माउलींचा गजर, घालीन लोटांगण व बोला पुंडलिक वरदाहरी विठ्ठल या उपसंहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.