प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कचऱयाची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काही भागात कचराकुंडी नसल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. येथील भाग्यनगर 5 वा क्रॉस येथे कचराकुंडी नसल्याने घरातील कचरा, झाडांचा पालापाचोळा रस्त्यावरच टाकण्यात येत आहे. हा कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने परिसर अस्वच्छ बनलेला निदर्शनास येत आहे. या भागात कचराकुंडी नसल्याने नागरिकांना आपल्या घरातील कचरा रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. याशिवाय अनोळख्या व्यक्तीकडून येथे वैद्यकीय कचरादेखील टाकण्यात येत असल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. या भागातील कचरा उचलण्याकडे दिरंगाई करण्यात येत असल्याने सदर समस्या उद्भवली आहे. त्यामुळे या ठिकाणी कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करावी आणि वैद्यकीय कचरा टाकणाऱया व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.