‘युनेस्कोकडून राज्यातील शिक्षण पद्धतीचा पर्दाफाश, 239 शाळा एकल शिक्षकी’
प्रतिनिधी / मडगाव
गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) भाजप सरकारच्या अपुऱया आणि अपयशी शिक्षण पद्धतीचा पर्दाफाश केला असल्याचे म्हटले आहे. ही पद्धती एकाच शिक्षकासह राज्यात 239 शाळा चालवत आहे. शैक्षणिक क्षेत्राला बाजूला सारून भाजपने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याला बदनाम केले आहे, असे सरदेसाई म्हणाले.
हे लज्जास्पद आहे की, भाजप सरकार शिक्षण क्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात अपयशी ठरले आहे. या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, गोव्यातील 16.08 टक्के शाळांमध्ये फक्त एक शिक्षक आहे, यामुळे राज्य या श्रेणीमध्ये देशात दुसऱया क्रमांकावर आहे. अहवालानुसार, राज्यातील 1486 शाळांपैकी 239 शाळा म्हणजे 16.08 टक्के शाळा एकल शिक्षकी शाळा आहेत. एकूण 93 टक्के एकल शिक्षकी शाळा ग्रामीण भागांत आहेत, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले आहे.
सरकारने शैक्षणिक क्षेत्राकडे इतके दुर्लक्ष करू नये. उलट सरकारने त्यास प्राधान्य दिले पाहिजे आणि नवीन प्रणाली विकसित केल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची निवड केली पाहिजे. पण गोव्यात असे काही होताना दिसत नाही, असे सरदेसाई म्हणाले. एकच शिक्षक अनेक विद्यार्थी आणि विषयांसह शाळा कशी चालवू शकतो. यामुळे विद्यार्थी त्यांचे विषय नीट शिकण्यापासून वंचित राहतील, असे त्यांनी निदर्शनास आणले.
खोटी आश्वासने देऊन तरुणांची फसवणूक
सरदेसाई म्हणाले की, जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा मुख्यमंत्री सावंत हजारो नोकऱयांचे आश्वासन देतात. पण ते प्रत्यक्षात कधीच येत नाही. या अहवालातून राज्यातील लोकांना हे समजले पाहिजे की, हे सावंतवाडी सरकार केवळ खोटी आश्वासने देऊन तरुणांना फसवत आहे. जर मुख्यमंत्री सावंत खरोखरच शैक्षणिक क्षेत्राबद्दल गंभीर असतील, तर त्यांनी या समस्येकडे लक्ष द्यायला पाहिजे होते आणि शिक्षकांची भरती करायला हवी होती, असे ते म्हणाले.
लोकांना उत्तर द्यावे
सरदेसाई यांनी आरोप केला आहे की, सावंत यांनी शैक्षणिक क्षेत्राचे प्राधान्य बाजूला केले आहे आणि केवळ निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. विद्यार्थ्यांना चांगली इंटरनेट सेवा देण्याचे वचन त्यांनी पाळले नाही. दुर्गम भागांत मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी देण्यात ते अपयशी का ठरले आणि एका शिक्षकासह शाळा का चालविल्या जात आहेत याचे उत्तर त्यांनी लोकांना द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.