प्रतिनिधी / वास्को
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने कठीण परिस्थितीतही चांगले कार्य करून दाखवलेले असून देशाच्या गंभीर समस्याही सरकारने सोडवल्या आहेत. पंतप्रधानांनी जनतेला जी आश्वासने दिली होती. ती त्यांनी पूर्ण केलेली आहेत. सरकारची कार्यपध्दती आवडल्यानेच भाजपाचे सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेवर आलेले आहे असे प्रतिपादन राज्याचे नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार दुसऱयांदा सत्तेवर आल्यास वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री मिलिंद नाईक यांनी केंद्र सरकारच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी वास्को भाजपा मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक, मुरगावचे भाजपा मंडळ अध्यक्ष संजय सातार्डेकर तसेच कुठ्ठाळी भाजपा मंडळाचे अध्यक्ष नारायण नाईक उपस्थित होते.
भाजपाच्या सरकारची कार्यपध्दती लोकांना पसंद पडल्याने सतत दुसऱयांदा हे सरकार सत्तेवर आले. पहिली पाच वर्षे आणि मागच्या एका वर्षात सरकारने चांगली कामगीरी बजावलेली आहे. पंतप्रधानांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. जास्तीत कामे सरकारने तडीस नेलेली आहेत. त्यामुळेच पूर्वीपेक्षा अधिक जनादेश भाजपाला मिळाला. अयोध्येच्या राम मंदिराचा कित्त्येक दशके न सुटलेला प्रश्न याच सरकारच्या काळात सुटला. राम मंदिराच्या कामालाही आता सुरवात झालेली आहे. तिहेरी तलाकचा प्रश्नही होता. तो आपल्या सरकारने सोडवल्याने मुस्लीम समाजातील महिलांना न्याय मिळाला. काश्मीरचा 370 व्या कलमाचा प्रश्न सोडवून सरकारने इतिहास घडवला. असे अनेक प्रश्न सरकारने सरकारने सोडवले.
कोरोना संसर्गामुळे ऐनवेळी देशात गंभीर समस्या निर्माण झाली. मात्र, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताने या प्रश्नात चांगली कामगीरी बजावलेली आहे. सध्या निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीतही सरकार चांगले कार्य बजावत आहे असे मंत्री मिलिंद नाईक यांनी सांगितले.
मंत्र्यानीही केले नियमांचे उल्लंघन, संकल्प आमोणकर यांची कारवाईची मागणी
मंत्री मिलिंद नाईक यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत तोंडावर मास्क लावला नव्हता. सामाजीक अंतराचेही पालन केले नव्हते. त्यांनीही जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाचा भंग केलेला असून त्यांच्याविरूध्दही कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनी मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केलेली असून मंत्र्यांविरूध्द कारवाई न झाल्यास कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला आहे.
आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेत नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून आपल्यासह आपल्या सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी पहाटे अटक केली. उपजिल्हाधिकाऱयांच्या तक्रारीनुसार ही कारवाई झाली होती. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी वास्कोत मंत्री मिलिंद नाईक यांनी जे काही नियमांचे उल्लंघन केलेले आहे, ते जनतेने पाहिलेले असून आता त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी आमोणकर यांनी केली आहे. मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वता मंत्री मिलिंद नाईक यांनी मास्क घातला नव्हता. त्यांनीही नियमांचे उल्लंघन केलेले आहे. कायदय़ासमोर मंत्री आमदार व सामान्य नागरीक सगळे सारखेच असून आमच्यावर जशी कारवाई झाली तशी कारवाई मंत्र्यावरही व्हायला हवी अशी मागणी आमोणकर यांनी केली आहे.