3 दिवसांत पक्षातील आमदार, खासदार, नेत्यांशी चर्चा
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात नेतृत्व बदलाच्या मुद्दय़ावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच राज्य भाजपमधील गोंधळावर तोडगा काढण्यासाठी भाजप राज्य प्रभारी अरुणसिंग बुधवारी राज्य दौऱयावर येत आहे. तीन दिवस त्यांचा बेंगळूरमध्येच मुक्काम असणार आहे. भाजपमधील मंत्री, आमदार, खासदार आणि असंतुष्टांशी चर्चा करून सुवर्णमध्य काढण्यासाठी ते प्रयत्न करतील.
राज्यात मुख्यमंत्री बदलणार नसल्याचा हाकमांडचा संदेश पोहोचवून देखील राज्य भाजपमधील काही नेत्यांनी दिल्लीवारी केल्याने गोंधळात भर पडली आहे. या राजकीय घडामोडींमुळे हायकमांडने अरुणसिंग यांना पक्षाच्या आणि सरकारच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसण्याआधीच त्यावर तोडगा काढण्याची सूचना केली आहे. त्यामुळे बुधवारपासून तीन दिवस अरुणसिंग बेंगळूर दौऱयावर येत आहेत.
बुधवारी दुपारी 2.30 वाजता ते नवी दिल्लीहून बेंगळूरला येतील. सायंकाळी 5 वाजता प्रदेश भाजप कार्यालयात प्रत्येक मंत्र्याशी स्वतंत्रपणे चर्चा करतील. रात्री ‘कुमारकृपा’ या अतिथीगृहात वास्तव्य करतील. गुरुवार 17 रोजी ते सकाळपासून सायंकाळपर्यंत पक्षातील आमदारांशी संवाद साधतील.
18 जून रोजी सकाळी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्यासमवेत पक्षाच्या विविध मोर्चांचे अध्यक्ष आणि मुख्य सचिवांशी अरुणसिंग चर्चा करतील. नंतर कोअर कमिटीची बैठक घेऊन मंत्री, आमदारांच्या मतांविषयी नेत्यांना सूचना करून रात्री दिल्लीला परत जातील. तीन दिवसांमध्ये झालेल्या घडामोडींचा अहवाल ते हायकमांडकडे सादर करणार आहेत.
नेतृत्व बदलाविषयी गोंधळ नाही : येडियुराप्पा
राज्यात नेतृत्व बदल असो किंवा इतर कोणत्याही विषयाच्या बाबतीत गोंधळ नाही. कोणा एका नेत्यामुळे नाराजी उद्भवलेली असेल तर त्यांच्याशी भाजप राज्य प्रभारी अरुणसिंग चर्चा करतील. अरुणसिंग बुधवारी राज्य दौऱयावर येत आहेत. ते सर्व मंत्री, खासदार, मंत्र्यांशी चर्चा करतील. कोणत्याही नेत्याला अरुणसिंग यांची भेट घेता येईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिली आहे.