विरोधीपक्षनेते सिद्धरामय्या यांचे वक्तव्य
प्रतिनिधी / बेळगाव
भाजप सरकारने केवळ जनतेची दिशाभूल करुन सत्ता मिळविली. मात्र या सरकार एवढे भ्रष्ट सरकार आजपर्यंत कर्नाटकात आले नव्हते. या सरकारकडे आता पगार आणि पेन्शन देण्यासही पैसे नाहीत. त्यामुळे 90 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले. आता ते कर्ज जनतेनेच फेडावे लागणार आहे. त्यामुळे भाजप सरकार हे कर्ज काढणारे सरकार असून आता जनता त्यांना धडा शिकविणार आहे. त्यामुळे 2023 मध्ये काँग्रेस सरकारच सत्तेत येणार आहे, असा विश्वास विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला.
जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. शुक्रवारी गांधी जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, ईश्वर खरडे, आमदार सतीश जारकीहोळी, माजी आमदार फिरोज सेठ, एस. आर. पाटील, आमदार अंजली निंबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर, गणेश हुक्केरी, अनिल लाड, महांतेश कौजलगी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, माजी आमदार वीरकुमार पाटील यांच्यासह इतर काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आणि जिल्हय़ातील नेत्यांसाठी या कार्यालयाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी स्वतः झोकून देवून पक्षाचे कार्य करावे. कोणतीही बैठक याच कार्यालयात घेवून कार्यकर्त्यांना वरि÷ काँग्रेसच्या नेत्यांनी मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले. भाजपने जे सत्ता मिळविण्यासाठी राजकारण केले आहे ते राज्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. काँग्रेसला 38 टक्क्मयांपेक्षा अधिक मते असताना 36 टक्के मते घेतलेल्या भाजपला सत्तेत येण्याचा कोणताच अधिकार नव्हता. मात्र केवळ पैशाच्या जोरावर आमदार खरेदी करुन भाजपने सत्ता मिळविली, असा आरोपही त्यांनी केला आहे.
अनेक रोगांची बाधा झालेले सरकार
केपीसीसीचे राज्याध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, सध्या जे सरकार सत्तेवर आहे ते अनेक रोगांची बाधा झालेले सरकार आहे. त्यामुळे त्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. यापुढे त्या सरकारचा पाय उतार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जावून काँग्रेसच्या कार्याची माहिती देवून कार्यकर्त्यांना सदस्य करुन घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
बेंगळूरनंतर बेळगाव जिल्हय़ामध्येच काँग्रेस पक्षाचे कार्यालय झाले आहे. हे अत्याधुनिक कार्यालय झाले असून त्याचा उपयोग योग्य प्रकारे करुन घ्यावा. त्यासाठी वरि÷ काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देवून मार्गदर्शन करावे, असे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
संपूर्ण देशाची दिशाभूल
ईश्वर खरडे म्हणाले, अच्छे दिन येणार असे सांगून संपूर्ण देशाची दिशाभूल भाजपने केली आहे. काँग्रेसने भारत स्वतंत्र करण्यासाठी जे योगदान दिले आहे ते कुणीच दिले नाही. काँग्रेसने देशाला स्वातंत्र मिळवून दिले? मात्र काँग्रेसने काय केले असे म्हणून आज सत्ता घेतली आणि संपूर्ण देशाची फसवणूक केली, असा आरोप त्यांनी केला.
एस. आर. पाटील यांनीही भाजपवर कडाडून टीका केली. याचबरोबर आमदार सतीश जारकीहोळी यांनी कार्यालय उभे करताना आलेल्या अडचणी सांगून कार्यकर्त्यांनी यापुढे पक्षाच्या झेंडय़ाखाली एकजुटीने काम करण्याची सूचना केली आहे. काँग्रेसचे कार्यालय झाले आता सेवादलाचेही लवकरच कार्यालय उभे केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विरोधीपक्षनेते सिद्धरामय्या यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याचबरोबर विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.