प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बेमुदत बंद करणार
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावचे भाजीमार्केट हे एक मोठे आणि नावाजलेले भाजीमार्केट म्हणून ओळखले जाते. या भाजीमार्केटमधून गोवा, महाराष्ट्र या राज्यांना भाजीपुरवठा करण्यात येतो. मात्र, कोरोनामुळे दोन ठिकाणी तात्पुरते भाजीमार्केट सुरू करण्यात आले आहे. मात्र, त्या ठिकाणी एपीएमसी प्रशासनाने कोणत्याच सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. भर पावसामध्ये भाजीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. चिखलाचे साम्राज्यही पसरले आहे. गाळय़ांवरील पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे आता दोन्ही भाजीमार्केट बेमुदत बंद करण्याचा निर्णय व्यापारीवर्गाने घेतला आहे.
नुकत्याच झालेल्या वादळी वाऱयासह मुसळधार पावसाने रविवारी मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सीपीएड मैदान आणि ऑटोनगर येथील आरटीओ मैदानावर तात्पुरते भाजीमार्केट सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी केवळ पत्रे उभे करून शेड बांधण्यात आली आहेत. शेतकरी भाजी घेऊन आल्यानंतर त्यांना कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. परराज्यांतून आलेले व्यापारी तसेच स्थानिक व्यापाऱयांनाही कोणत्याच सुविधा नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.
भाजी पूर्णपणे पावसात भिजत आहे. त्यामुळे व्यापारी लोक भाजी खरेदी करण्यास तयार नाहीत. जमिनीवरच भाजी ठेवण्यात येत आहे. मोठा पाऊस झाल्यानंतर त्या भाजीमध्येच पाणी शिरत आहे. रविवारी त्यामुळे व्यापारीवर्गाचे अतोनात नुकसान झाले. व्यवसाय करणे कठीण झाल्याने आता भाजीमार्केट बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक गाळय़ांवरील पत्रे उडून गेले. त्यामुळे अनेकांना दुखापतीही झाल्या. चिखलाचे साम्राज्य या परिसरात निर्माण झाले होते. व्यापारीवर्गाला तसेच खरेदीदारांना आडोसा शोधावा लागला. साऱयांना जीव मुठीत घेऊन व्यवसाय करावा लागत होता. त्यामुळे व्यापारीवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शेतकरीवर्गाला बसला मोठा फटका
होलसेल भाजी खरेदीदारांनी बेमुदत बंद जाहीर केला असून शेतकऱयांनी आणि इतर व्यापाऱयांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शेतकरीवर्गाला मोठा फटका बसणार आहे. कारण एकतर पावसामुळे शेतातच भाजी कुजून जात आहे. त्यातच हा बंद झाला तर मोठा फटका बसण्याची भीती शेतकऱयांतून व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा एपीएमसीच्या प्रशासनाने तातडीने याबाबत निर्णय घेऊन व्यापारीवर्ग व शेतकऱयांना सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.