वार्ताहर / हुपरी
हुपरी व परिसरातील भाग औद्योगिक असल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी राहण्यासाठी व व्यवसायासाठी भाड्याने घेतलेल्या घराचे भाडे थकले असल्यास कोणालाही घरातून बाहेर काढू नये अथवा त्रास देऊ नये अशी सुचना महाराष्ट्र शासन गृनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी केली आहे.
हुपरी, पट्टाकोडोली,रेंदाळ हे औद्योगिक क्षेत्र असून या ठिकाणी चांदी पासून दागिने बनविण्याचे छोटे मोठे कारखाने आहेत व रेंदाळ या गावात यंत्रमाग कारखाने आहेत. यानिमित्ताने कामासाठी पर प्रांतातून, जिल्ह्यातून कारागीर ,मजूर आले आहेत. त्यांना राहण्यासाठी व व्यवसायासाठी भाड्याने घर,गाळा घेऊन डिपॉझिट ठेवून मासिक तत्वावर भाडे द्यावे लागते. सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे.सदरचे लॉकडाऊन3मे2020 पर्यंत जारी राहणार आहे.सर्व व्यवसाय, संस्था, कारखाने बंद असल्याने आर्थिक व्यवहार थांबला आहे.याचा सर्व सामान्य जनतेच्या रोजगारावरही फार मोठा परिणाम झाला असून उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे.या अभूतपूर्व परिस्थितीमुळे अत्यंत कठीण अशा अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.
हुपरी व परिसरात भाड्याच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे .या परिस्थितीमध्ये भाडेकरूंना रहात असलेल्या घराचे, दुकानाचे भाडे भरणे शक्य होत नसल्याने थकीत प्रमाण वाढत आहे अशी वस्तुस्थिती आहे.तरी घर मालकांनी भाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी तसेच वेळेत भाडे आले अथवा थकले तर कोणत्याही भाडेकरूंना घरातून काढू नये अथवा कोणतीही कारवाई करू नये अशी सुचना महाराष्ट्र शासन गृनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव यांनी दिली आहे.