जि. प. कृषी समिती सभेत माहिती : पाच कोटी आल्याची पालकमंत्र्यांनी दिलेली माहिती खोटी – रणजीत देसाई
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
अतिवृष्टीमध्ये भातशेतीच्या झालेल्या नुकसानीपोटी फक्त 32 लाख 35 हजार रुपये एवढी रक्कम सिंधुदुर्गसाठी प्राप्त झाली आहे, अशी माहिती जि. प. च्या कृषी समिती सभेत उघड होताच सिंधुदुर्गसाठी पाच कोटी प्राप्त झाल्याची पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी केला. शेतकऱयांची ही घोर फसवणूक असून शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याची टीकाही जि. प. च्या सत्ताधारी सदस्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.
जि. प. च्या कृषी समिती सभा बॅ. नाथ पै. समिती सभागृहामध्ये सभापती तथा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गटनेते रणजित देसाई, समिती सदस्य अमरसेन सावंत, प्रीतेश राऊळ, सुधीर नकाशे, महेंद्र चव्हाण, गणेश राणे, संजय देसाई, सायली सावंत, समिती सचिव तथा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, अरुण नातू, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
23 हजार शेतकऱयांचे नुकसान
यावर्षी ऐन भातकापणीच्यावेळी अतिवृष्टी होऊन भातशेतीचे नुकसान झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हय़ात 23 हजार शेतकऱयांचे सुमारे 15 कोटीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱयांना दिवाळीपूर्वी नुकसानीची रक्कम देऊन तोंड गोड करणार, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. तर पालकमंत्र्यांनी पाच कोटी प्राप्त झाल्याचे जाहीर केले होते. याबाबत वस्तुस्थिती काय आहे, अशी विचारणा गटनेते देसाई यांनी केली असता भातशेती नुकसानीपोटी फक्त 32 लाख 35 हजार एवढीच रक्कम प्राप्त झाली आहे. दोडामार्ग तालुक्याला 5 लाख 50 हजार, सावंतवाडीला तीन लाख, कुडाळला आठ लाख 42 हजार, मालवण तालुक्याला सहा लाख, कणकवली तालुक्याला तीन लाख, देवगड तालुक्याला तीन लाख, वैभववाडी तालुक्याला तीन लाख आणि वेंगुर्ले तालुक्याला तीन लाख रुपये या प्रमाणे वाटप करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाचे अधिकारी अरुण नातू यांनी दिली.
32 लाखाची रक्कम प्राप्त
15 कोटीची आवश्यकता असताना फक्त 32 लाख 35 हजाराची रक्कम सरकारने दिली आहे. त्यामुळे शेतकऱयांची घोर फसवणूक करुन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱयांच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसल्याची टीका जि. प. तील सत्ताधारी सदस्यांनी केली. तर पालकमंत्री उदय सामंत यांनी पाच कोटी जिल्हय़ाला आल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप देसाई यांनी केला. महाविकास आघाडी सरकार सिंधुदुर्ग जिल्हय़ाला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हवामान केंद्राचा रोजचा रिपोर्ट द्या!
देवगड तालुक्यात बापर्डे येथील हवामान केंद्रावर वेगळय़ा तापमानाची नोंद आणि दोन किलोमीटरवर असलेल्या पाटगाव हवामान केंद्रावर वेगळय़ा तापमानाची नोंद आणि त्यातही मोठा फरक असल्याचे सदस्य गणेश राणे यांनी लक्ष वेधताच जिल्हय़ातील सर्व 39 हवामान केंद्रांचा रोजच्या रोज रिपोर्ट घेऊन कृषी समितीच्या प्रत्येक सभेमध्ये सादर करण्याचे आदेश उपाध्यक्ष म्हापसेकर यांनी दिले.
बंधारे, नद्यातील गाळ काढा!
आरवली बंधाऱयामध्ये गाळ साचला आहे. याची कृषी व लघु पाटबंधारे विभागामार्फत संयुक्त पाहणी करावी आणि गाळ काढण्यात यावा, अशी सूचना प्रीतेश राऊळ यांनी मांडली. त्याचबरोबर जिल्हय़ातील सर्वच नद्या-नाल्यांमध्ये गाळ साचल्याने तो काढण्यासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठरावही मांडण्यात आला.
भाजीपाला बियांचे 1600 कीट उपलब्ध
भाजीपाला बियांचे 1600 किट उपलब्ध झाले आहेत. जिल्हय़ातील शेतकऱयांनी भाजीपाल्यांच्या बिया घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपाध्यक्ष म्हापसेकर यांनी केले आहे. फळपिक विमा योजनेंतर्गत शेतकऱयांना विम्याची रक्कम भरण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत होती. ती मुदत वाढवून देण्यात यावी, अशी सूचना सुधीर नकाशे यांनी केली.