वृत्तसंस्था/ चेंगडु (चीन)
शनिवारपासून येथे सुरु झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या महिलांच्या उबेर चषक सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताने कॅनडाचा 4-1 अशा फरकाने पराभव करत आपल्या मोहिमेला शानदार प्रारंभ केला.
भारत आणि कॅनडा यांच्यातील या लढतीमध्ये भारताची नवोदीत बॅडमिंटनपटू अस्मिता चलिहाने शानदार कामगिरीचे दर्शन घडविताना कॅनडाच्या अव्वल मिचेली ली चा एकेरीच्या सामन्यात 26-24, 24-22 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. अस्मिताने हा सामना 42 मिनिटांमध्ये जिंकला. कॅनडाच्या ली ने 2014 आणि 2022 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात भारताच्या के. प्रिया आणि श्रुती मिश्रा यांनी कॅनडाच्या कॅथरेनी चोई व जेसलीन चो यांचा 21-12, 21-10 असा पराभव करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एकेरीच्या सामन्यात भारताच्या इशरानी बारुआने कॅनडाच्या झेंगवर 21-13, 21-12 अशी मात केली. या विजयामुळे भारताने कॅनडावर 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली होती. त्यानंतर महिलांच्या दुसऱ्या दुहेरीच्या सामन्यात कॅनडाच्या जॅकी डेंट व क्रिस्टल यांनी भारताच्या सिमरन सिंघी व रितीका ठक्कर यांचा 21-15, 21-11 असा पराभव केला. आता भारतीय महिला संघाचे अ गटातील पुढील सामने अनुक्रमे रविवारी आणि मंगळवारी सिंगापूर व चीन बरोबर होणार आहेत. तसेच थॉमस चषक पुरूषांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची सलामीची लढत थायलंड बरोबर होत आहे.