ऑनलाईन टीम / बीजिंग :
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या ब्रह्मपुत्रा नदीवर चीन मोठे धरण आणि जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे. भारतासाठी चीनचा हा प्रकल्प चिंता वाढवणारा आहे. या प्रकल्पाचे कंत्राट मिळालेल्या कंपनीच्या हवाल्याने चिनी माध्यमांनी हे वृत्त प्रसिध्द केले आहे.
ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये तिबेटी भाषेत यारलुंग जंगबो म्हटले जाते. तिबेटमधील स्वायत्त भागातून जाणारी ही नदी अरुणाचल प्रदेशातून भारतात प्रवेश करते. आसामवरुन ही नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते. त्यामुळे या दोन्ही देशांच्या दृष्टीने ही नदी महत्वाची आहे. चीनच्या या प्रकल्पामुळे पूर्वोत्तर राज्ये आणि बांग्लादेशमध्ये दुष्काळासारखी स्थिती निर्माण होऊ शकते.
चीन ब्रह्मपुत्रा नदीच्या खालच्या भागात जलविद्युत योजना सुरु करेल. ही योजना जल संसाधने आणि देशांतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी सहाय्यकारी ठरु शकतात, असे पॉवर कन्स्ट्रक्शन्स कॉर्पोरेशन ऑफ चीनचे अध्यक्ष यांग जियोंग यांनी म्हटले आहे. पुढील वर्षी लागू होणाऱ्या 14 व्या पंचवार्षिक योजनेत या प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.