श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नौशेरा सेक्टर येथे भारतीय सैन्याने लाईन ऑफ कंट्रोलवर दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. पाकिस्तानकडून मंगळवारी रात्री येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर देत पाकिस्तानचे दोन सैनिक ठार केले. सैन्याच्या सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. गेल्या काही दिवसात पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. मात्र, भारतीय लष्करही दक्ष असल्याने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले जात आहे. यापूर्वी 10 डिसेंबरला पाकिस्तानी सैन्याने सीमेवर रात्रभर गोळीबार केला होता. गोळीबाराचे केंद्र जम्मू- कश्मीरचे पुंछ सेक्टर हे होते.
भारतीय सैन्याने प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच्या पाच सैनिकांना ठार केले होते. त्यापूर्वी जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्हय़ात नौशेरा सेक्टरमध्ये 24 नोव्हेंबरला पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय सैन्याचे एक हवालदार शहीद झाले होते. भारताने पाकिस्तानी सैन्याला त्याच भाषेत उत्तर दिले होते.
आतापर्यंत 3,200 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन 1999 मध्ये युद्धबंदीच्या उल्लंघनांबाबत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी करार केला होता. मात्र, पाकिस्तान या कराराचे सतत उल्लंघन करत आहे. यावषी पाकिस्तानने 3,200 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. 2019 मध्ये त्यांची संख्या 3,168 आणि 2018 मध्ये 1,629 होती. यामध्ये 30 नागरिक ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले होते.