ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राष्ट्रपती, पंतप्रधानांसह राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह भारतातील 10 हजार दिग्गज व्यक्ती आणि संस्थांवर चीनच्या झेन्हुआ कंपनीकडून पाळत ठेवली जात आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
झेन्हुआ कंपनीचे चिनी सरकारशी संबंध असल्याचे आढळून आले आहे. या कंपनीचे मुख्यालय शेन्झेन शहरात असून, कंपनीच्या माध्यमातून चिनी सरकार भारतातील प्रमुख व्यक्तींवर पाळत ठेवत आहे. या कंपनीकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संरक्षण दलांचे प्रमुख बिपीन रावत, 15 माजी लष्करप्रमुख, वैज्ञानिक, उद्योगपती रतन टाटा आणि सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर, लोकपाल पी. सी. घोष, भारताचे महालेखा परीक्षक (कॅग) जी. सी. मुर्मू यांच्यासह अनेकांवर पाळत ठेवली जात आहे. तसेच भारतातील गुन्हेगार व्यक्तींचा तपशीलही या कंपनीकडे आहे.
भारतातील दिग्गज व्यक्ती आणि संस्थाच नव्हे तर देशातील भ्रष्टाचार, दहशतवाद, सोने तस्करी, आर्थिक गैरव्यवहार यावरही या संस्थेचे लक्ष आहे. ही संस्था चिनी लष्करासोबत काम करत आहे.