साखर दरवाढीमुळे निर्यातीला चालना
दत्तात्रय जाधव / पुणे
जागतिक बाजारात साखरेच्या दराने अडीच वर्षातील उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे भारतातून यावर्षी विक्रमी 50 लाख टन साखरेची निर्यात होण्याचा मार्ग आता खुला झाला आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक पिट्टे यासंदर्भात बोलताना म्हणाले, जागतिक बाजारात साखरेच्या दरात मागील दोन महिन्यात तब्बल 30 टक्के वाढ झाली असून, शुक्रवारी दर 424 डॉलर प्रतिटनापर्यंत पोहोचले. दरवाढीमुळे साखरेची निर्यात कारखानदारांसाठी आकर्षक बनली आहे. मागील गळीत हंगामात साखर निर्यात करताना कारखानदारांना प्रतिकिलो एक ते दोन रुपये तोटा होत होता. सध्या, मात्र सरकारी अनुदान पकडल्यास प्रतिकिलो दोन ते तीन रुपये फायदा होत आहे.
केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी प्रतिटन 10,448 रुपये अनुदान मंजूर केले असून, साखर कारखान्यांसाठी 60 लाख टन निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गळीत हंगामाच्या सुरुवातीला जागतिक बाजारात दर आकर्षक नसल्याने देशातून केवळ 40 लाख टन साखर निर्यात होईल, असा अंदाज होता. मात्र, दर सुधारल्याने यावषी 50 लाख टनाहून अधिक निर्यात होईल, असे साखर कारखानदारांनी सांगितले. यावर्षी आत्तापर्यंत 29 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी व्यवहार झाले आहेत. यातील बहुतांशी व्यवहार हे उत्तर प्रदेशमधील कारखानदारांनी केले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये या वर्षी साखरेचे उत्पादन घटणार असल्याने निर्यातीने अजून वेग पकडलेला नाही. या दोन राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी निर्यातीचा कोटा पूर्ण केला नाही. त्यांचा कोटा इतर कारखान्यांना या महिन्यात सरकार विभागून देऊ शकते, असे पिट्टे यांनी सांगितले.
थकीत रक्कमही लवकरच मिळणार
देशातील साखर कारखान्यांनी जानेवारी अखेरपर्यंत 141.12 लाख टन साखरेचे उत्पादन केले असून, ते मागील वषीच्या तुलनेत 24 टक्के कमी असल्याचे इस्माने म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये जानेवारीअखेर 34.64 लाख टन साखरेचे उत्पादन झाले, तर कर्नाटकमध्ये 27.94 लाख टनाचे. निर्यातीने वेग घेतल्याने स्थानिक बाजारातही साखरेचे दर सुधारण्यास मदत होत असल्याचे व्यापाऱयांनी सांगितले. यावषी देशातील कारखानदारांनी मागील वषीच्या तुलनेत ऊस उत्पादक शेतकऱयांची कमी रक्कम थकवली असून, तीदेखील लवकरच देण्यात येईल, असेही पिट्टे यांनी नमूद कले.
स्थानिक बाजारातही साखरेचे दर वाढतील : बी. बी. ठोंबरे
दरम्यान, अतिवृष्टी आणि मागील वर्षीचा दुष्काळ यामुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज साखरेचे दर वाढले आहेत. निर्यातीने वेग घेतल्यास स्थानिक बाजारातही साखरेचे दर वाढतील, असे वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशन अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.