वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
यंदा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियन भूमीत होणाऱया विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतात छोटेखानी आयपीएल खेळवली जावी, असा बराच विचारप्रवाह आहे. पण, याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी नजीकच्या भविष्यात भारतात क्रिकेट होणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले. कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे क्रिकेट मागे फेकले गेले आहे. सध्या फक्त प्रत्येकाचे स्वास्थ्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. उत्तम स्वास्थ्यापेक्षा क्रिकेट अजिबात महत्त्वाचे ठरु शकत नाही, याचाही त्यांनी येथे उल्लेख केला.
यंदाची आयपीएल स्पर्धा सध्या अनिश्चित कालावधीकरिता लांबणीवर टाकली गेली आहे. ही स्पर्धा सुरु झाल्यानंतर अशी वेळ येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी आयपीएल स्पर्धा भरवता येईल का, याची चाचपणी सुरु केली आहे. पण, मंडळाकडून याला दुजोरा देण्यात आला नाही. क्रिकेटपेक्षा स्वास्थ्य महत्त्वाचे, असे गांगुली याबाबत बोलताना म्हणाले.
जर्मनीत रिकाम्या स्टेडियममध्ये बुंदेस्लिगा फुटबॉल स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. पण, भारतात आयपीएलबाबत तसे करता येणार नसल्याचे गांगुली यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘जर्मनी व भारत यांच्यातील सामाजिक वस्तुस्थिती खूप विभिन्न आहे. भविष्यात भारतात लवकर क्रिकेट होणे अशक्य आहे.’