नवी दिल्ली/प्रतिनिधी
भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडून (India crosses milestone of 100-crore Covid-19 vaccine doses) एक नवा इतिहास रचला आहे. देशात आतापर्यंत दिलेल्या कोरोनाविरोधी लसींच्या डोसची संख्या १०० कोटींच्या पुढे गेली आहे. देशातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी १६ जानेवारी २०२१पासून लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली. त्यानंतर लसीकरणावर अधिक भर देऊन ही मोहीम वेगाने राबवण्यात आली. आज २७७ दिवसात भारताने विक्रमी कामगिरी केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (prime minister narendra modi) भारताने इतिहास रचला आहे, हा भारतीय विज्ञान, उद्योग, भारतीयांच्या सामूहिक भावनेचा विजय आहे असे म्हटले आहे. लसींच्या डोसची संख्या १०० कोटी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी राम मनोहर लोहिया रुग्णालयात पोहोचले होते., जिथे त्यांनी रुग्णालय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
भारताने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे.या ऐतिहासिक दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावर (Lal Quila) जगातील सर्वात मोठा ध्वज फडकवला जाणार आहे. तसेच देशातील या सुवर्ण कामगिरीमुळे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. देशातील १०० ऐतिहासिक वास्तुंना तिरंग्याच्या रुपात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याद्वारे सर्व आरोग्य कर्मचार, फ्रंटलाईन वर्कर्स, वैज्ञनिका, लस उत्पादक यांचा सन्मान करून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहली जाणार आहे.
कोविन डॅशबोर्डच्या माहितीनुसार, आतापर्यंत १०० कोटी १५ हजार ७१४ जणांचे लसीकरण झाले आहे. यापैकी ७० कोटी ८३ लाख १८ हजार ७०३ जणांनी पहिला डोस घेतला असून २९ कोटी १६ लाख ९७ हजार ११ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.