पाकिस्तानला सुचले शहाणपण : इम्रानच्या सल्लागाराने दिली कबुली
@ वृत्तसंस्था / इस्लामाबाद
कंगालीच्या स्थितीला तोंड देणाऱया पाकिस्तानने आता भारतासोबत व्यापाराची नितांत गरज असल्याचे मान्य केले आहे. भारतासोबत व्यापार आता काळाची गरज ठरला असल्याचे उद्गार पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे वाणिज्य तसेच वस्त्राsद्योग विषयक सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांनी काढले आहेत.
द्विपक्षीय व्यापार दोन्ही देशांसाठी लाभदायक असणार असल्याचे ते म्हणाले. तर यापूर्वी पाकिस्तानने काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू केल्यावरच भारतासोबत व्यापार सुरू करणार असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान अनेक दशकांनी पहिल्यांदा रशियाच्या दौऱयावर जात असताना त्यांच्या सल्लागाराने हे विधान केले आहे. रशियाच्या दौऱयादरम्यान इम्रान हे गॅस पाईपलाईनसंबंधी राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करणार आहेत.
भारतासोबत व्यापार व्हायला हवा असे वाणिज्य मंत्रालयाचे मानणे आहे. भारतासोबत चर्चा सुरू करण्यात यावी. भारतासोबत व्यापार सर्वांसाठी विशेषकरून पाकिस्तानसाठी अत्यंत लाभदायक असल्याचे दाऊद यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानसाठी लाभदायक
अफगाणिस्तानमार्गे रशिया आणि मध्य आशियातील अन्य देशांमधून नैसर्गिक वायू आणण्याची योजना इम्रान खान सरकारची आहे. ही गॅस पाईपलाईन भारतापर्यंत निर्माण करण्यात आल्यास पाकिस्तानला यातून मोठा निधी मिळू शकतो. भारत आणि पाकिस्तान यांच्यात पडद्याआड चर्चा सुरू असल्याचा दावा यापूर्वी पाकिस्तानचे अब्जाधीश मियां मांशा यांनी केला होता.