ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय क्रिकेट संघातील करारबद्ध खेळाडूंना मागील 10 महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बीसीसीआय खेळाडूंचे 99 कोटी रुपये देणे लागते. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
सत्तावीस भारतीय खेळाडू बीसीसीआयच्या विविध करारश्रेणीत मोडले जातात. या सर्व खेळाडूंना ऑक्टोबर महिन्यापासून मानधन मिळाले नाही. तसेच डिसेंबर 2019 पासून भारतीय संघाने खेळलेल्या दोन कसोटी, 9 वन-डे आणि 8 टी- 20 सामन्यांची मॅच फी ही बीसीसीआयने अद्याप दिली नसल्याची माहिती समोर आली आहे.
बीसीसीआय भारतीय खेळाडूंना A+, A, B आणि C अशा 4 श्रेणींमध्ये विभागते. त्यानुसार खेळाडूंना 4 टप्प्यात मानधन दिले जाते. बीसीसीआय प्रत्येक 3 महिन्यांनी आपल्या करारबद्ध खेळाडूंना इन्व्हाईस पाठवायला सांगते. मागील 10 महिन्यात खेळाडूंना याबाबत विचारणा झाली नाही. प्रशासकीय कामांमध्ये महत्वाच्या पदावर माणसे नसल्यामुळे खेळाडूंना मानधन देण्यास उशीर होत असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटले आहे.