वृत्तसंस्था / दोहा
2022 विश्वचषक व 2023 आशिया चषक पात्रतेचे सामने खेळण्यासाठी भारतीय संघाचे येथे आगमन झाले असून येथे दाखल झाल्यानंतर त्यांची कोव्हिड 19 चाचणी घेण्यात आली आहे. सरावाला सुरुवात करण्याआधी ते या अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.
28 सदस्यीय संघ व साहायक स्टाफमधील सदस्य बुधवारी रात्री दिल्लीहून येथे दाखल झाले आहेत. ‘सर्व खेळाडू व साहायक स्टाफमधील सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी घेण्यात आली असून त्याचा अहवाल येईपर्यंत सर्वजण सक्तीच्या क्वारंटाईनमध्ये राहतील,’ असे एआयएफएफने निवेदनाद्वारे सांगितले. अहवाल मिळाल्यानंतर सरावाला प्रारंभ करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कर्णधार सुनील चेत्रीचे पुनरागमन झाल्याने संघाची ताकद वाढली असून बायोबबलमध्ये त्यांचे सराव शिबिर घेण्यात येणार आहे. यजमान कतारविरुद्ध भारताचा पहिला सामना 3 जून रोजी होणार आहे. अन्य दोन सामने बांगलादेश (7 जून) व अफगाणिस्तान (15 जून) यांच्याविरुद्ध होणार आहेत. नियोजनानुसार मायदेशात व प्रतिस्पर्ध्याच्या देशात सामने खेळविले जातात. पण कोरोना महामारीमुळे त्याला बगल देण्यात आली असून दोन्ही सामने दोहामध्येच खेळविले जात आहेत. गट ई मध्ये भारतीय संघ 3 गुणांसह चौथ्या स्थानावर असून विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळविण्याच्या शर्यतीतून भारतीय संघ याआधीच बाहेर पडला आहे. मात्र 2023 मध्ये चीनमध्ये होणाऱया आशिया चषक स्पर्धेत स्थान मिळण्याची भारताला अजूनही आशा आहे.
प्रत्यक्ष सामने होण्याच्या खूप आधी संघाला दोहामध्ये येण्याची तसेच सराव शिबिर आयोजित करण्याची परवानगी दिल्याबद्दल एआयएफएफने कतार फुटबॉल संघटनेचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे भारतीय संघाला 10 दिवसांचे हार्ड क्वारंटाईन लागू न करताच कतार फुटबॉल संघटनेने सराव करण्याची परवानगी दिली आहे. ‘कतारमध्ये आम्हाला लवकर शिबिर घेता यावे यासाठी संघटनेने जे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,’ असे एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास म्हणाले. ‘गट ई मधील वर्ल्ड कप पात्रता सामने जैवसुरक्षित बायोबबलमध्ये खेळविले जातील,’ असेही ते म्हणाले. भारतीय संघाचे राष्ट्रीय शिबिर कोलकात्यात 2 मे पासून घेतले जाणार होते. पण कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे ते रद्द करण्यात आले. याशिवाय दुबईमध्ये एक मित्रत्वाचा सामनाही बंदिस्त स्टेडियममध्ये घेतला जाणार होता. पण तोही रद्द करावा लागला होता. ‘एआयएफएफ अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी कतार फुटबॉल संघटनेशी सविस्तर चर्चा करून आपली अडचण त्यांना सांगितली. त्यांनी ती प्रधानमंत्री कार्यालयात उपस्थित केल्यानंतर 10 दिवसांचे क्वारंटाईन रद्द करण्यात आले,’ असेही दास यांनी स्पष्ट केले.