परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचे इस्रायलमध्ये प्रतिपादन
जेरुसलेम / वृत्तसंस्था
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर सध्या इस्रायलच्या दौऱयावर असून त्यांनी सोमवारी इस्रायलमधील भारतीय ज्यू समाजाबरोबर संवाद साधला आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध दृढ होत असून त्यासाठी इस्रायलमधील भारतीय ज्यूंचे योगदान अनन्यसाधारण आहे, अशी भलावण त्यांनी केली.
भारतात ज्यू समाज कित्येक शतके शांततेने राहिला आहे. भारतातील हिंदू समाजाने या समाजाला नेहमी सन्मान दिला. इस्रायलच्या स्थापनेनंतर भारतातील अनेक ज्यू इस्रायलमध्ये स्थायिक झाले. मात्र ते नेहमी भारतात त्यांना दिल्या गेलेल्या सन्मानासाठी भारताची प्रशंसा करतात. त्यांच्या पुढाकारानेच भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ होत असून भविष्यकाळात दोन्ही देश आणखी एकमेकांच्या जवळ येतील, अशी भावना जयशंकर यांनी व्यक्त केली.
नव्या क्वॉडची स्थापना ?
भारत, इस्रायल, संयुक्त अरब अमिरात आणि अमेरिका हे चार देश मिळून दुसरा ‘क्वॉड गट’ बनविण्याच्या तयारीत आहेत, असे सांगण्यात येत आहे. सोमवारी या चारही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली. या चार देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सामरिक संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी हा गट स्थापन केला जाणार आहे, अशी चर्चा आहे.
या चर्चेत परस्पर सहकार्यावर विचार करण्यात आला. गुंतवणूक, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, व्यापार आणि सांस्कृतिक सहकार्यावर भर देण्यात आला, अशी माहिती देण्यात आली. भारताच्या वतीने परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी भारताच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. आशिया क्षेत्रात शांतता रहावी पण त्याच बरोबर भारत स्वसंरक्षणासाठी सक्षम आणि सिद्ध असून सामरिक क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, यावर जयशंकर यांनी भर दिल्याचे समजते.
मुक्त व्यापार करार होणार
भारत आणि इस्रायल यांच्यात मुक्त व्यापार करार करण्यासंदर्भात चर्चा करण्यावर सहमती झाली आहे. पुढील महिन्यापासून ही चर्चा सुरु होईल. पुढील जून पर्यंत असा करार अस्तित्वात येईल यावरही एकमत झाले आहे. सोमवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायलचे ‘पर्यायी पंतप्रधान’ आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री याईर लापीड यांच्याशी या विषयावर चर्चा केली. ही चर्चा अत्यंत फलदायी होती, असे प्रतिपादन नंतर जयशंकर यांनी केले.
कोरोना प्रमाणपत्रास मान्यता
दोन्ही देश एकमेकांच्या कोरोनामुक्त प्रमाण पत्राला मान्यता देण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे भारताच्या नागरीकांना इस्रायलचा दौरा करणे आता शक्य होणार आहे. तसेच इस्रायलचे नागरीकही भारताचा दौरा करु शकतील. भारताच्या लसीकरणाला इस्रायल लवकरच मान्यता देणार असल्याचे संकेत देण्यात आले. भारत आणि इस्रायल यांच्यात पर्यावरण संरक्षणासंबंधीही बोलणी झाली.
दोन्ही देश आणखी निकट
ड भारत आणि इस्रायल यांच्यात आर्थिक, सामरिक संबंध अधिक दृढ