मुंबई / वृत्तसंस्था :
सलामीला कोण, हा पेच सोडवण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने पूर्ण पुढाकार घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज (मंगळवार दि. 14) पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा-शिखर धवन ही जोडी सलामीला उतरेल, केएल राहुल संघात समाविष्ट असेल आणि या तिघांना सामावून घेण्यासाठी विराट तिसऱया स्थानाऐवजी मध्यफळीत त्यापेक्षा खालील क्रमांकावर खेळेल, असा तोडगा निघाला. ऑस्ट्रेलियाचा संघ मालिकेत पूर्ण ताकदीने उतरणार असून त्यामुळे देखील उभय संघात आणखी जुगलबंदी रंगणे अपेक्षित आहे. आजच्या लढतीला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल.
नियमित सलामीवीर रोहित शर्मा प्रचंड बहरात आहे तर दुसरीकडे, डेव्हिड वॉर्नरही कोणत्याही लढतीत धोकादायक ठरण्याची क्षमता राखून असतो. एकीकडे, विराटसारखा कसलेला फलंदाज भारताकडे आहे तर स्टीव्ह स्मिथ संघात परतल्याने ऑस्ट्रेलिया पुन्हा मजबूत झाली आहे. यामुळे 3 सामन्यांची ही वनडे मालिका अधिक रोमांचक ठरेल, असा होरा आहे.
जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी हा भारताचा जलद गोलंदाजीचा ताफा आपल्या वैविध्याच्या बळावर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कसून परीक्षा घेईल तर दुसरीकडे, आयपीएलमधील सर्वात महागडा विदेशी गोलंदाज पॅट कमिन्स, केन रिचर्डसन व मिशेल स्टार्क हे भारतीय फलंदाजांसाठी खेळपट्टीवर तग धरणेही मुश्किल करण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरतील. ऍलेक्स कॅरेची उपयुक्त फलंदाजी आणि बिनचूक यष्टीरक्षण हे ऑस्ट्रेलियासाठी बलस्थान ठरु शकते. युवा फलंदाज मार्नस लाबुशाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक उत्तूंग झेप घेण्यासाठी सज्ज असणार आहे.
धवनसमोर मोठे आव्हान
केएल राहुल व रोहित शर्मा कारकिर्दीतील सर्वोत्तम बहरात आहेत. मात्र, धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नेहमीच लक्षवेधी योगदान दिले असल्याने त्याचा येथे प्राधान्याने विचार झाला आहे. यापूर्वी उभय संघात झालेल्या आयसीसी वनडे विश्वचषकातील लढतीत भारताने धवनच्या तडफदार शतकामुळेच भारताने सहज बाजी मारली होती. अर्थात, याला आता सात महिन्यांचा कालावधी लोटला असून धवनला या कालावधीत बऱयाच समस्यांचा सामना करावा लागला आहे. विश्वचषकात धवन असेतोवर केएल राहुल चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरला होता. पण, त्यानंतर चौथ्या स्थानी श्रेयस अय्यर स्थिरावला आहे.
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी ही एरवी फलंदाजीला पोषक असते. यामुळे भारतीय संघ निश्चितच दोन फिरकीपटूंना खेळवण्याची चूक करणार नाही, असे संकेत आहेत. मार्चमध्ये उभय संघात भारतात शेवटची वनडे मालिका झाली, त्यात ऑस्ट्रेलियाने यजमान संघाला 2-3 अशी धूळ चारली होती. या मालिकेत यजुवेंद्र चहलऐवजी कुलदीप यादवला प्राधान्य दिले जाईल, असे संकेत आहेत. यादवच्या खात्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच हॅट्ट्रिक नोंद आहे.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रविंद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया : ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), पॅट्रिक कमिन्स, ऍस्टॉन ऍगर, पीटर हँडस्कॉम्ब, जोश हॅझलवूड, मार्नस लाबुशाने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, ऍस्टॉन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 पासून.
अन्यथा, केदार जाधवसाठी ही मालिका शेवटची?
पुण्याचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव प्रदीर्घ कालावधीपासून आंतरराष्ट्रीय संघातून मिळालेल्या संधीचे सोने करु शकलेला नाही. आयपीएलमध्ये अधिक खेळता यावे, यासाठी तो ऑफब्रेक गोलंदाजी जवळपास थांबवू इच्छित आहे, अशीही चर्चा आहे. पण, संघातील प्रत्येक जागेसाठी एकंदरीत असलेली स्पर्धा व सातत्याने उभे राहणारे अनेकविध पर्याय यामुळे केदार जाधवला या मालिकेत तरी स्वतःला सिद्ध करावेच लागणार आहे. येथे तो स्वतःला सिद्ध करु शकला नाही तर ही मालिका त्याच्यासाठी कदाचित शेवटची असू शकते, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.