ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमधील भारत- चीन सीमावादाची परिस्थिती जैसे थे आहे. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी वरिष्ठ लष्करी पातळीवर काही बैठकाही झाल्या. मात्र, या वादावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघाला नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज स्पष्ट केले.
राजनाथसिंह म्हणाले, लडाख सीमारेषेवरून भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. एप्रिल 2020 पासून हा तणाव कायम आहे. दोन्ही देशांनी सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. तसेच दोन्ही देशांनी युद्धसज्जता ठेवली आहे.
चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. चीन सीमाभागात त्यांच्या बाजूने पायाभूत सुविधा तयार करत आहे. तर भारत आपल्या सैन्यासाठी आणि नागरिकांसाठी काम करत आहे, असेही राजनाथसिंह म्हणाले.