वृत्तसंस्था/ माले
सॅफ चषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी येथे झालेल्या सलामीच्या लढतीत 10 खेळाडूंनिशी खेळणाऱया बांगलादेशने भारताला 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने आपला 76 वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदविला.
37 वर्षीय सुनील छेत्रीने 27 व्या मिनिटाला भारतातर्फे एकमेव गोल नोंदविला. छेत्रीचा हा भारतातर्फे 121 वा सामना होता. आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रामध्ये सर्वाधिक गोल करणाऱया फुटबॉलपटूंच्या यादीत आता सुनील छेत्री चौथ्या स्थानावर आहे. या यादीत पोर्तुगालचा ख्रिस्टीयानो रोनाल्डो 111 गोलांसह पहिल्या, अर्जेंटिनाचा लायोनेल मेस्सी 79 गोलांसह दुसऱया तसेच संयुक्त अरब अमिरातचा अली मेबखोत 77 गोलांसह तिसऱया स्थानावर आहे. ब्राझीलचा फुटबॉल सम्राट पेले यांनी 92 सामन्यांत 77 गोल नोंदविले आहेत.
सोमवारच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत भारतीय संघाचा खेळ बांगलादेशच्या तुलनेत निश्चित वरचढ झाला. काही वेळा भारतीय खेळाडूंना चेंडूवर ताबा ठेवता आला नाही. 27 व्या मिनिटाला छेत्रीने भारताचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत भारताने बांगलादेशवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. 54 व्या मिनिटानंतर बांगलादेश संघासमोर समस्यांना प्रारंभ झाला. बांगलादेश संघातील फुटबॉलपटू घोष याला पंचांनी लालकार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने बांगलादेशला सामन्याच्या उर्वरित कालावधीत 10 खेळाडूंनिशी खेळावे लागला. दरम्यान बांगलादेशने आक्रमक चढाया करत भारतीय संघावर दडपण आणण्यात यश मिळविले. 74 व्या मिनिटाला यासीर अराफतने हेडरद्वारे गोल करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. 2022 च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्र फेरीच्या कोलकाता येथे झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात बांगलादेशने खेळाच्या उत्तरार्धात गोल नोंदवून भारताला बरोबरीत रोखले होते. त्यानंतर भारताने दुसऱया टप्प्यातील सामन्यात बांगलादेशचा 2-0 असा पराभव केला होता.
भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळावर भर दिला. भारतीय संघातील चिंग्लेसेना सिंगने बांगलादेशच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण त्याला गोल नोंदविता आला नाही. खेळाच्या पूर्वार्धातील 24 व्या मिनिटाला मनवीर सिंगचा हेडरद्वारे मारलेला फटका बांगलादेशच्या गोलपोस्टवरून गेला. 39 व्या मिनिटाला छेत्रीने मारलेला फटका बांगलादेशचा गोलरक्षक रेहमानने थोपविला. 40 व्या मिनिटाला बांगलादेशने भारतीय गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली पण गोलरक्षक गुरूप्रितसिंग संधुने बांगलादेशच्या अहमदचा हा फटका थोपविला. भारतीय संघातील प्रशिक्षक स्टिमॅक यांनी खेळाच्या उत्तरार्धात थापाला विश्रांती देत ब्रेंडॉन फर्नांडिसला मैदानात आणले. 61 व्या मिनिटाला भारताच्या मनवीर आणि उदांता सिंग यांचे फटके बांगलादेश गोलरक्षकांनी थोपविले. शेवटी ही लढत 1-1 अशी बरोबरीत राहिली. आता भारताचा या स्पर्धेतील राऊंडरॉबिन लीग गटातील दुसरा सामना लंकेबरोबर गुरूवारी खेळविला जाणार आहे.