ऑनलाईन टीम / हैदराबाद :
भारत बायोटेकने कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी आठ हजार स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. मागील आठवड्यात या कंपनीने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निष्कर्षाच्या आधारे औषध नियामककडे लसीच्या मार्केटिंगसाठी मंजुरी मागितली आहे.
फिक्कीच्या कार्यक्रमात बोलताना भारत बायोटेक इंटरनॅशनलचे (बीबीआयएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला म्हणाले, लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांसाठी 22,000 स्वयंसेवकांपैकी आम्ही 8000 स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. बीबीआयएलने 17 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरू केली आहे.
माकडांवरील चाचणीनंतर आलेल्या निष्कर्षातून या लसीची कार्यक्षमता दिसून आली आहे. लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निष्कर्षाच्या आधारे ही लस मानवी शरीरासाठी सुरक्षित असल्याचे दिसून आले. त्यामुळे कंपनीने लसीच्या मार्केटिंग मंजुरीसाठी अर्ज केला आहे.