तपासाला न्यायालयाची परवानगी : टिळकवाडी पोलिसांकडे प्रकरण वर्ग
प्रतिनिधी/ बेळगाव
मुचंडी (ता. बेळगाव) येथील एका तरुणाचा खून करून अपघात भासविण्याचा प्रयत्न झाला होता. शुक्रवारी ‘तरुण भारत’ने या प्रकरणाला वाचा फोडताच शहरात एकच खळबळ माजली आहे. त्या तरुणाच्या भावोजींच्या समोरच त्याचा खून करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे.
महेश महादेव अवणी (वय 28, रा. मुचंडी) या तरुणाचा 24 जुलै रोजी खून झाला होता. अनगोळ परिसरातील एका आमराईत खून करून अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते. मारिहाळ पोलीस स्थानकात अपघात प्रकरणाची नोंदही झाली होती.
या प्रकरणात संशय बळावताच मारिहाळ पोलिसांनी तपासाची चपे फिरविली होती. महेशचा मृत्यू अपघातात झाला नाही तर त्याचा खून झाल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी न्यायालयात परवानगी मागितली होती. शुक्रवारी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतिय न्यायालयाने तपासाला परवानगी दिली आहे.
खुनाचा प्रकार अनगोळ परिसरात झाल्यामुळे हे प्रकरण पुढील तपासासाठी टिळकवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांमार्फत हे प्रकरण वर्ग करण्यात आले असून एक-दोन दिवसात टिळकवाडी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष तपासाला सुरुवात होणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार आमराईत तब्बल एक ते दीड कि.मी. महेश व त्याच्या भावोजींना चालवत नेवून महेशवर हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या महेशला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्या मृत्यूनंतर अपघात भासविण्यात आला. त्याचा भावोजी व कुटुंबीयांना धमकावून हा सारा प्रकार करण्यात आला आहे.
भावोजींनी चौकशीत खून झाल्याची दिली कबुली
महेशच्या मृत्यूनंतर भावोजीला धमकाविण्यात आल्याने तो आजारी पडला होता. इस्पितळातून डिस्चार्ज झाल्यानंतर पोलिसांनी महेशच्या भावोजीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी मारेकऱयांच्या भीतीपोटी त्याने सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता नंतर त्याने खून झाल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी जमविली तांत्रिक माहिती
यासंबंधी मारिहाळ पोलिसांनी संपूर्ण तांत्रिक माहिती जमविली आहे. महेशचा मृत्यू अपघातात झाला नाही तर त्याचा खून झाला आहे, हे दर्शविणारे अनेक पुरावे तपास अधिकाऱयांच्या हाती लागले आहेत. महेशचा भावोजी हाच खुनाचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. मात्र यापुढे होणाऱया तपासात पोलीस अधिकारी किती गांभीर्याने या प्रकरणाकडे पाहतात, यावरून तपासाची दिशा ठरणार आहे. एखाद्याचा खून करून तो पचविण्यासाठी अपघाताचा बनाव करणाऱया टोळीच्या मुसक्मया आवळल्यानंतरच खुनाचे निश्चित कारण उघडकीस येणार आहे.