साहित्यिक किरण गुरव : आरपीडीमहाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन
प्रतिनिधी/ बेळगाव
मधुर आणि मृदू बोलण्याने आपण दुसऱ्यांची मने जिंकू शकतो. मात्र त्यासाठी समोरच्याची भाषा अवगत असणे गरजेचे आहे. भाषेमध्येही सर्वात महत्त्वाची असते ती ‘मातृभाषा’. कारण कोणताही विचार आपण पहिल्यांदा मातृभाषेतूनच करतो. अनेक लेखक व साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. सीमाभागात मराठीची अवहेलना होत असतानाही भाषा टिकवून ठेवण्यासाठीचा संघर्ष हा बेळगावमध्येच दिसून येतो, असे उद्गार शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक किरण गुरव यांनी काढले.
एस.के.ई. सोसायटी संचालित राणी पार्वती देवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘मराठी साहित्य व संस्कृती सुगंध’ या एकदिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून किरण गुरव बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर, माजी प्राचार्या डॉ. शोभा नाईक, प्राचार्या अनुजा नाईक, संस्थेच्या सदस्या बिंबा नाडकर्णी, कवि गोविंद पाटील, विभागप्रमुख परसू गावडे उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन किरण ठाकुर म्हणाले, मराठी भाषा ही जगातील महत्त्वाच्या पहिल्या पंधरा भाषांमध्ये गणली जाते. सीमाभागातील इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी बोलता येतं परंतु वाचता व लिहिता येत नाही. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रसारासाठी मराठी प्रसारसभा सुरू करण्यात येणार आहे. हिंदी प्रचार सभेच्या धर्तावर प्रथमा, मध्यमा याप्रमाणे मराठीच्याही परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सीमाभागात मराठी जपलीच पाहिजे, ही आमची आग्रही भूमिका असली तरी आम्ही इतर भाषांचा अनादर करत नसल्याचे त्यांनी सांगितले.
माजी प्राचार्या शोभा नाईक यांनी मराठी भाषा व सध्याची परिस्थिती याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात बिंबा नाडकर्णी यांनी मराठीचा गोडवा सांगितला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वृंदा पाटील हिने मराठी अभिमान गीत सादर केले. प्रा. परसू गावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
विविध कवितांना रसिकांची दाद
दुसऱ्या सत्रात कवि गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन पार पडले. प्रा. लता कणबरकर, प्रा. महादेव खोत, अंजली देशपांडे व जयश्र्र्री कणकुंबकर यांनी विविध कविता सादर केल्या. कवि गोविंद पाटील यांच्या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. विविध विषयांवर आधारित या सत्रामध्ये कविता सादर करण्यात आल्या.