संपकरी कुटुंबीयांचे भावनिक आवाहन : परिवहन कर्मचाऱयांच्या वेतनवाढीसाठी ताटे वाजवून सरकारचा निषेध
प्रतिनिधी / बेळगाव
गुढीपाडव्याचा सण आहे, आम्हाला भिक्षा वाढा. म्हणजे आम्हीसुद्धा सण साजरा करू. सरकार आमच्याकडे पहायला तयार नाही… तुम्ही तरी आमच्यावर दया करा, असे भावनिक आवाहन करत परिवहन कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चक्क भिक्षा मागितली. एकीकडे सरकार खासगी वाहनांचा आधार घेऊन सेवा पुरवत आहे. दुसरीकडे कर्मचारी संपावर गेले आहेत. तर तिसरीकडे कुटुंबीय भीक मागत आहे. एकूणच अनेक कोंडीमध्ये हा संप सापडला असून, अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही.
सोमवारी परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांनी वेतन वाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ताटे वाजवून सरकारचा निषेध केला. आणि जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. अद्यापही तोडगा निघत नसल्याने कर्मचाऱयांचे कुटुंबीय आंदोलनात उतरले असून, वेगवेगळय़ा निषेध मार्गानी त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. सरकार, परिवहन मंत्री, अधिकारी यांच्यापैकी कोणीही आमच्या प्रश्नाबाबत संवेदनशील नाहीत, अशी टिकाही आंदोलनकर्त्यांनी केली. या संपामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आमच्या संपाला अनेक जणांनी पाठिंबा दिला आहे. पण सरकारी कर्मचारी म्हणजे अधिकाऱयांच्या घरातील मजूर नाहीत. गेले कित्येक महिने आम्हाला अर्धा पगारच दिला आहे. मार्च महिन्यात आम्ही काम केले आहे. परंतु सरकारने अद्याप पगार दिला नाही. आम्ही प्रत्येक अधिकाऱयांना भेटून विनवणी करत आहोत. आम्ही चोरून खात नाही किंवा ओरबडून घेत नाही. परंतु आमच्या पतीनी काम केले आहे. त्यांचे वेतन द्या आणि वेतनवाढ करा, अशी मागणी आम्ही करत आहोत. अन्यथा भीक मागण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असे कुटुंबीयांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले.
या आंदोलनाचाच भाग म्हणून कर्मचाऱयांच्याच कुटुंबीयांनी परिसरात चक्क भीक मागितली. पाडव्याचा सण आह.s आम्हालासुद्धा सण करू द्या. त्यासाठी भीक घाला, असे म्हणत कर्मचाऱयांच्या पत्नी आणि मुलांनीसुद्धा भीक मागितली.
दरम्यान, या संपामुळे खासगी वाहनधारक आणि टेम्पोचालक यांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र कोरोना काळातसुद्धा सामाजिक अंतराच्या नियमाचे पूर्ण उल्लंघन करत टेम्पोमधून आणि टेम्पोच्या बाहेरूनसुद्धा बिनदिक्कत प्रवास सुरू आहे. रिक्षाचालकांनी दुप्पट आकारणी करू नये, कोविड 19 च्या नियमांचे पालन करावे, खासगी वाहनचालकांनी सहकार्य करावे, या अधिकाऱयांनी केलेल्या आवाहनाला चक्क वाटाण्याच्या अक्षता लावून खासगी प्रवासी वाहतूक सुरू आहे. संपावर तोडगा काढण्याची जबाबदारी ही सरकारची असली तरी नियमांचे पालन केले जावे यावर लक्ष देण्याची जबाबदारीही अधिकाऱयांची आहे. त्यामुळे संपावर तोडगा निघेपर्यंत त्यांनी नियमांचे पालन करून प्रवासी वाहतूक सुरू राहिल यावर लक्ष देण्याची व नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याची गरज आहे.