‘मिनू काय नाटक करतेस गं? चल आता निमूटपणे लिफ्टमधून. नको गं सीमा बाकी काहीही सांग. त्या दिवशी सगळं पाहिलं ना तू? तरी आग्रह करतेस? मला आता लिफ्टने जायचं या कल्पनेनंच अस्वस्थ वाटतं. पोटात गोळा येतो. दोन तीन वेळा जे काही अनुभवलं त्याचीच भीती वाटते आता. थांब थांब लिफ्टचे दार उघडू नको.’ ‘अगं काय बावळटपणा आहे हा? बाकी भाषण ठोकतेस आणि लिफ्टला घाबरतेस? लहान आहेस का आता? त्या दिवशीही नंतर उत्तम होतीस की. अगदी नॉर्मल.’
‘अगं हो, तेवढय़ा वेळेपुरती भीती वाटते मला.’ ‘तुझं काही कळत नाही बघ. एकेकदा वाटतं नाटकच करतेस. एवढी कसली भीती गं? हे बघ, तू काही म्हण, मी जाते चालत जिन्याने वर. तू ये निवांतपणे.’ असे म्हणत मिनू भराभर जिन्याच्या पायऱया चढून निघून गेली. काय वेडेपणा आहे हा? असे म्हणत सीमाही लिफ्टने निघाली. एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये चाललेला हा संवाद भीतीच्या निरगाठीवर प्रकाश टाकणारा होता.
भयगंड म्हणजे भीतीची गाठ. एखाद्या गोष्टीची भीती वाटणे आणि पुन्हा तिथे गेल्यावर तशीच भीती वाटेल की काय याची भीती वाटणे हे चक्र अनेकदा फोबियामध्ये पहायला मिळते. फोबियामध्ये एक असते केंद्रीय म्हणजेच प्राथमिक भीती आणि सेकंडरी भीती. सेकंडरी भीती म्हणजे मूळ भीती वरील भीतीचे थर. एकदा एखाद्या गोष्टीची भीती वाटल्यानंतर त्यावेळी निर्माण झालेल्या संवेदना किंवा ती शारीरिक लक्षणे परत जाणवतील किंवा तशीच भीती वाटेल की काय याचीच भीती वाटणे म्हणजेच मूळ भीतीवरील भीतीची अनेक आवरणे असेही म्हणता येईल. खरंतर अनेकदा प्राथमिक भीती वाटते त्याचे कारण क्षुल्लक असते परंतु भीतीला मनाने दिलेला प्रतिसाद मात्र प्रचंड असतो. त्यावेळी अनेक शारीरिक लक्षणे जाणवू लागतात. वेगवेगळय़ा संवेदना निर्माण होतात. अवसान गळून जाते. भीतीचा हा झटका एवढा जबरदस्त आणि अनपेक्षित असतो की, ती भीती मनात रुतून बसते नुसत्या कल्पनेनेच मग अस्वस्थता येऊ लागते. कधी हात पाय थरथरू लागतात, छातीत धडधडते, श्वास कोंडतो, जिवाचा कोंडमारा झाल्यासारखे होते, काही काहीही सुचत नाही, विचारांची साखळी तुटते आणि मग ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट टाळली जाऊ लागते.
ही भीती अनेकदा क्षुल्लक गोष्टी, प्रसंग वा कल्पनेने निर्माण होते. भयभीत व्यक्तीलाही त्याची लाज वाटत असते. परंतु ‘कळतंय पण वळत नाही’ अशीच काहीशी स्थिती होते. काहींना गडगडाटाची, रस्ता क्रॉस करण्याची, रक्ताची, कुत्र्या-मांजराची, झुरळ पालीची, लिफ्टची, बंद खोलीची, गर्दीची, मृत्यूची अशा वेगवेगळय़ा प्रकारांची भीती वाटत असते. भयगंडाची गाठ प्रयत्न केले तर नक्की सोडवता येते. परंतु सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यामध्ये निरगाठ असते ती अशी की, त्या भीती वाटणाऱया गोष्टींपासून दूर गेल्यावर ती व्यक्ती इतकी नॉर्मल असते की याच व्यक्तीला त्रास होत होता का, हा प्रश्न इतरांना पडतो.
अशावेळी ती व्यक्ती नाटक करते आहे असे म्हटले जाते. त्या व्यक्तीला खरंच असा त्रास होत असेल यावर कोणी विश्वास ठेवत नाही. त्यामुळे मात्र भयगंडाचा प्रश्न सोडवणे अवघड होते. फोबियाग्रस्त व्यक्ती अधिक हट्टी आणि नकारात्मक होते.
फोबियाची कारणमीमांसा दोन प्रकारे केली जाते. एक तर एखाद्या परिस्थितीत रुग्णाला खरोखरच गर्भगळीत करणारा अनुभव आला असेल तर तशी विशिष्ट परिस्थिती वा आठवणही फोबिया यायचे कारण ठरते. तीव्र भीतीदायक अनुभव ज्यावेळी प्रथम आला असेल त्यावेळची परिस्थिती वा योगायोगाने जवळपास असलेल्या वस्तू या सर्वांची रुग्णाला भीती वाटू लागते. काही वेळा या भीतीची साखळी तयार होते. वैद्यकीय परिभाषेत ही कारणमीमांसा ‘कंडिशनिंग’ या शब्दाने वर्णन केली जाते. बिहेविअर थिअरी (वर्तनवाद) या मतांमध्ये तिचा समावेश होतो. तर मनोविश्लेषण शास्त्राच्या स्पष्टीकरणानुसार फोबिक वस्तूंची भीती ही केवळ वरकरणी असते, भीतीचे खरे कारण ती वस्तू नसून अंतर्मनात दडलेला दुसराच कुठलातरी विचार हे असते. खरेतर बऱयाच व्यक्तींच्या जीवनात भीतीदायक प्रसंग घडतात परंतु सर्वांनाच फोबिया जडत नाही. या दोन्ही कारणांशिवाय व्यक्तिमत्त्वातील वैशिष्टय़ेही फोबियाला कारणीभूत ठरू शकतात. चिंतातूर, अडचणीच्या प्रसंगी झटकन धीर सोडणाऱया व्यक्तींच्या साध्यासुध्या भयाचे, फोबियामध्ये सहजपणे रूपांतर होऊ शकते. संकटांना तोंड देण्याऐवजी बगल देण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. त्यांना फोबियाचा त्रास लवकर जडू शकतो. सर्व फोबियामध्ये समान सूत्र आहे ते म्हणजे फोबिक वस्तू टाळली की रुग्णाला हलक्ंाsढ वाटते. फोबिया जेवढा तीव्र तेवढी टाळाटाळ अधिक.
फोबियाला दूर करायचे असेल तर रुग्णाला खरेच भीती वाटते आहे हे ओळखायला हवे. ‘कसली नाटकं करतेस वा करतोस? काय झालं उगीचच घाबरायला?’ असे उद्गार कुटुंबीयांनी, मित्रमंडळींनी काढणे टाळायला हवे. कारण अशा पद्धतीची शेरेबाजी जेव्हा ती व्यक्ती ऐकते तेव्हा तिच्या संकटात एकटेपणाची भर पडते. काळजी करणाऱया, घाबरणाऱया, निराश वाटणाऱया माणसाच्या भावना कितीही अनाठायी आहेत असे इतरांना वाटले तरी त्या व्यक्तीच्या दृष्टीने त्या खऱयाच असतात. त्यामुळे त्या व्यक्तीला खरच अशा प्रकारचा त्रास होतो आहे हे ओळखून, स्वीकारून, आधार देऊन, योग्य उपचार पद्धतीचा अवलंब केला तर भयगंड निश्चितच दूर करता येतो. त्या व्यक्तीची चेष्टा, हेटाळणी करत राहिलो तर ती व्यक्ती अधिक नकारात्मकतेकडे जाते. भीतीचे मूळ अगदी इवलेसे असले तरीही त्यातूनच नंतर भीतीचा मोठा वृक्ष तयार होतो हे लक्षात घ्यायला हवे.
मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, फोबिया होण्यामध्ये मेंदूतील जैवरासायनिक प्रक्रिया जशा कारणीभूत होतात तसेच मनावर केलेले भीतीचे संस्कार व भीती कमी करण्याच्या प्रयत्नांची टाळाटाळ हे घटकही कारणीभूत आहेत.
चिंताशामक औषधे, समुपदेशन, सायकोथेरपी व वर्तन उपचार पद्धतीद्वारे फोबियाची तीव्रता कमी करून त्यावर मात करता येते. भीतीची संवेदना कमी करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मनाचे संतुलन, वास्तवाची सुयोग्य जाणीव, फोबिया ग्रस्त व्यक्तीचे भीतीला सामोरे जाण्याचे प्रयत्न, कुटुंबीयांची साथ, स्वतःचे नकारात्मक मूल्यमापन थांबविणे या गोष्टी फोबियावर मात करायला मदत करतात. आणि मनस्वास्थ्यही टिकवून ठेवायला मदत करतात. योग्य मार्गदर्शन आणि प्रामाणिक प्रयत्न यातून फोबिया निश्चितपणे नियंत्रणात येऊ शकतो. भीतीचे झालेले कंडिशनिंग बदलण्यासाठी तसेच फोबिक गोष्टीला सामोरे जाण्यासाठी सजगता तंत्र अर्थात ‘माइंड फुलनेस थेरपी’चा उपयोग होतो. माईंड फुलनेसची काही तंत्रे आत्मसात केल्यास भीतीला सामोरे जाणे जमू लागते अर्थात ही तंत्रे कशी उपयुक्त ठरतात हे निश्चितच जाणून घेऊया, परंतु पुढच्या भागात.
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583