अयोध्येत राम मंदिर उभारणीस लवकरच प्रारंभ
राम मंदिर उभारणीसाठी 5 ऑगस्ट रोजी होणाऱया भूमिपूजन सोहळय़ात सुमारे 8 हजार पवित्र स्थळांवरील पवित्र माती, जलाचा वापर होईल. सामाजिक समरसतेचा संदेश देण्यासाठी देशभरातून माती आणि जलाचा संग्रह केला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच 3 हजार ठिकाणांहून माती आणि जल अयोध्येत पोहोचल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी दिली आहे.
आदिवासी स्थळावरील माती
माती आणि जल एकत्र करण्याचा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समरसतेला बळकटी देण्याचे अनोखे उदाहरण आहे. झारखंडमधील सरना हे आदिवासी समाजाचे महत्त्वपूर्ण पूजास्थळ आहे. तेथील मृदा घेण्यासाठी गेलो असता दलित आणि आदिवासी समाजात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण दिसून आल्याचे उद्गार चौपाल यांनी काढले आहेत.
पवित्र नद्यांचे जल
भगवान श्रीरामांनी सामाजिक समरसता आणि सशक्तीकरणाचा संदेश दिला असल्याने भूमिपूजनात देशभरातील पवित्र नद्यांचे जल आणि तीर्थस्थळांवरील मातीचा वापर केला जात आहे. भगवान श्रीरामांकडून अहिल्येचा उद्धार, शबरी आणि निषादराज यांच्याशी असलेली मैत्री सामाजिक समरसतेचे अनुपम उदाहरण असल्याचे उद्गार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी काढले आहेत.
बिहारचाही समावेश
बिहारच्या फल्गू नदीतील वाळू अयोध्येत पाठविली जात आहे. गया, पावापुरी येथील जलमंदिर, कमल सरोवर, प्राचीन पुष्करणी तालाव, हिलसा येथील प्रसिद्ध सूर्य मंदिर, सम्राट चंद्रगुप्त मौर्याशी संबंधित भोरा तालाव येथील मृदा तसेच जल अयोध्येत पाठविण्यात येत आहे. भूमिपूजनासाठी मंदराचल पर्वतावरील माती पाठविण्यात आली आहे. या पर्वताचा पौरोणिक साहित्यात उल्लेख सापडतो.
महापुरुषांचे जन्मस्थळ
काशी येथील संत रविदास यांचे जन्मस्थळ, बिहारच्या सीतामढी येथील महर्षी वाल्मिकी आश्रम, महाराष्ट्रातील कचारगड, झारखंडच्या रामरेखाधाम, मध्यप्रदेशच्या टंटय़ा भीलच्या पुण्यभूमीशी संबंधित स्थळे, पाटण्यातील श्रीहरमंदिर साहिब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू, दिल्लीचे जैन मंदिर आणि वाल्मिकी मंदिर यासारख्या ठिकाणांहून मृदा तसेच पवित्र जल एकत्र केले जात आहे. पश्चिम बंगालच्या कालीघाट, दक्षिणेश्वर, गंगासागर आणि कूचबिहारच्या मदनमोहन यासारख्या मंदिरांमधील पवित्र मृदेसह गंगासागर, भगिरथी, त्रिवेणी नद्यांच्या संगमावरून जल अयोध्येत पाठविले जात आहे.
पुलावाम्याचा केशर, केरळचा काजू, ऑस्ट्रेलियाच्या बेसनद्वारे रघुपति लाडू
श्रीराम मंदिर उभारणीसाठी होणाऱया भूमिपूजनानिमित्त पाटण्यातील महावीर मंदिर विशेष लाडू तयार करत आहे. भूमिपूजन सोहळय़ाच्या निमित्त महावीर मंदिराकडून नैवैद्यम लाडू प्रसादाच्या स्वरुपात वाटला जाणार आहे. याकरता 1.25 लाख लाडू रामनगरी अयोध्येत तयार केले जात आहेत.
रामलल्लासाठी विशेष मोदक
या विशेष लाडूसाठी गायीच्या दूधाचे शुद्ध तुप बेंगळूर येथून मागविण्यात आले आहे. राजा ब्रँडचे बेसन ऑस्ट्रेलियात मागविले गेले आहे. विशेष केशर काश्मीरच्या पुलवामा येथून पोहोचले आहे. तर वेलची, काजू आणि किशमिश केरळमधून मागविण्यात आले आहे. या लाडूंना उत्तरप्रदेशच्या कारखान्यांमधील साखरेपासून गोडवा प्राप्त झाला आहे. लाडूचे डबे पाटण्यातून पाठविण्यात आले आहेत. पुलवामा येथील केशर अत्यंत मौल्यवान असतो. अयोध्येत नैवैद्यम रघुपति लाडूच्या नावाने त्यांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती महावीर मंदिर ट्रस्टचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांनी दिली आहे. तिरुपतीचे कुशल आचारी अयोध्येत लाडू तयार करत आहेत. महावीर मंदिर ट्रस्ट राम मंदिर उभारणीच्या कार्यात विशेष सक्रीयपणे कार्यरत आहे. महावीर स्थान न्यास समितीने मंदिर उभारणीसाठी 2 कोटींची देणगी जाहीर केली आहे. सुवर्ण सेवेची संधी मिळाल्यास महावीर ट्रस्ट गर्भगृह आणि त्याच्या द्वारासह सिंहासनही सुवर्ण तसेच रत्नजडित करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महापुरुषांचे जन्मस्थळ
काशी येथील संत रविदास यांचे जन्मस्थळ, बिहारच्या सीतामढी येथील महर्षी वाल्मिकी आश्रम, महाराष्ट्रातील कचारगड, झारखंडच्या रामरेखाधाम, मध्यप्रदेशच्या टंटय़ा भीलच्या पुण्यभूमीशी संबंधित स्थळे, पाटण्यातील श्रीहरमंदिर साहिब, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू, दिल्लीचे जैन मंदिर आणि वाल्मिकी मंदिर यासारख्या ठिकाणांहून मृदा तसेच पवित्र जल एकत्र केले जात आहे. पश्चिम बंगालच्या कालीघाट, दक्षिणेश्वर, गंगासागर आणि कूचबिहारच्या मदनमोहन यासारख्या मंदिरांमधील पवित्र मृदेसह गंगासागर, भगिरथी, त्रिवेणी नद्यांच्या संगमावरून जल अयोध्येत पाठविले जात आहे.
81 वर्षीय महिलेची 28 वर्षांनी पूर्ण होणार तपस्या
अयोध्येत वास्तव्याची इच्छा
अयोध्येत राम मंदिराची उभारणी माझ्यासाठी पुनर्जन्मासारखाच आहे. संकल्पाची पूर्तता झाली आहे, आता केवळ अयोध्येत उर्वरित जीवन व्यतित करण्यासाठी थोडीशी जागा मिळावी असे उद्गार उर्मिला यांनी काढले आहेत.
अयोध्येत राम मंदिर उभारणीस प्रारंभ होताच मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील रहिवासी 81 वर्षीय महिलेची तपस्या पूर्ण होणार आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडविण्यात आल्यावर दंगली झाल्याने व्यथित या महिलेने राम मंदिर उभारणीच्या कार्यास प्रारंभ होईपर्यंत अन्नग्रहण करणार नसल्याचा संकल्प घेतला होता. तेव्हापासून त्या केवळ फलाहारासह राम नाम घेत उपवासावर आहेत.
जबलपूरच्या विजयनगर येथील रहिवासी उर्मिला देवी यांनी वयाच्या 53 व्या वर्षी उपवास सुरू केला होता. उपवास सोडून द्या, अशी आर्जवे अनेकांनी घातली परंतु त्या संकल्पावर ठाम राहिल्या. मंदिर उभारणीच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर त्या अत्यंत आनंदी झाल्या होत्या. निर्णय देणारे न्यायाधीश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून त्यांनी अभिनंदन केले होते.
5 रोजी पंतप्रधान राम मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. त्या दिवशी उर्मिलादेवी घरात राम नामाचा जप करणार आहेत. रामलल्लाचे दर्शन घेतल्यावरच अन्नग्रहण करण्याची त्यांची इच्छा आहे. कोरोनामुळे अयोध्यत केवळ निमंत्रितांनाच जाता येणार असल्याने घरातच उपवास सोडावा अशी समजूत कुटुंबीय घालत आहेत, परंतु उर्मिलादेवी स्वतःच्या निर्णयावर अद्याप ठाम आहेत.
भूमिपूजनासाठी सुन्नी वक्फ मंडळाला निमंत्रण
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी श्रीरामजन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन होण्यासह तेथे सौहार्दाचे वातावरणही दिसून येणार आहे. राम मंदिर भूमिपूजन सोहळय़ात सुन्नी मध्यवर्ती वक्फ मंडळाचे अध्यक्ष जफर फारुखी, अयोध्येतील समाजसेवक पद्मश्री मोहम्मद शरीफ, बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अंसारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
इक्बाल यांचे वडिल हातिम अंसारी हे बाबरी मशिदीचे मुख्य पक्षकार होते, याचबरोबर राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व केलेले रामचंद्र परमहंस यांचे ते घनिष्ठ मित्र देखील होते. राम मंदिरासंबंधीच्या खटल्याच्या सुनावणीकरता दोघेही एकत्रच जायचे.
तर सुन्नी मध्यवर्ती वक्फ मंडळाने राम मंदिराच्या विरोधात खटला लढविला होता. तरीही सुन्नी मध्यवर्ती वक्फ मंडळचे अध्यक्ष जफर फारुखी यांना राम मंदिर भूमिपूजन सोहळय़ासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. तर बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे मोहम्मद शरीफ हे अयोध्येत राहतात. केंद्र सरकारने 2020 मध्ये त्यांना पद्मश्रीने गौरविले होते. मोहम्मद शरीफ यांनी अयोध्या तसेच परिसरात आतापर्यंत 5 हजारपेक्षा अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. भूमिपूजन सोहळय़ाच्या निमंत्रितांमध्ये त्यांचाही समावेश आहे.
श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनात सर्व धर्म, पंथ, सनातन धर्माच्या शंकराचार्यांसह सूफी संप्रदायाच्या प्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. यात ख्रिश्चन, जैन, शिख, मुस्लीम, बौद्ध धर्माच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे. या सर्वांना फोनच्या माध्यमातून निमंत्रण देण्यात आले आहे.
बाबा रामदेव यांचाही समावेश
भूमिपूजन सोहळय़ाच्या मुख्य निमंत्रितांमध्ये योगगुरु बाबा रामदेव, गायत्री परिवाराचे प्रणव पांडय़ा, कबीर पंथ, रामकृष्ण मिशन, केरळमधील मां अमृतानंदमयी, राम मंदिर आंदोलनाची धुरा दीर्घकाळापर्यंत सक्रीयपणे सांभाळणाऱया अशोक सिंघलांचे पुतणे, सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आणि भाजपच्या काही प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.